पावसाने घातला नुकसानीचा घाला अन् शेतकर्याने घेतला विषाचा प्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 12:28 PM2020-10-28T12:28:43+5:302020-10-28T12:32:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कांदा आणि कापसाचे नुकसान झाल्याने कर्जाच्या खाईत लोटल्या गेलेल्या शेतकर्याने शेतातच विष प्राशन करुन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कांदा आणि कापसाचे नुकसान झाल्याने कर्जाच्या खाईत लोटल्या गेलेल्या शेतकर्याने शेतातच विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना २५ ऑक्टोबर रोजी तालुक्यातील आसाणे येथे घडली. उपचार सुरू असताना शेतकर्याचा मृत्यू झाला.
सदाशिव ओंकार पाटील (४५) असे मयत शेतकर्याचे नाव आहे. सदाशिव पाटील यांनी यंदा त्यांच्या तीन एकर क्षेत्रात कांदा आणि कापूस लागवड केली होती. यासाठी उधार उसनवारी आणि कर्ज घेत खर्च केला होता. परंतू सलग दोन महिने झालेल्या पावसात पिकांचे नुकसान झाल्याने त्यांना मोठा फटका बसला होता. यातून हताश झालेल्या सदाशिव पाटील यांनी शेतात विष प्राशन केले होते. ही बाब कुटूंबियांसह ग्रामस्थांना समजून आल्यानंतर त्यांनी सदाशिव पाटील यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. याठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मयत शेतकर्याच्या पश्चात पत्नी दोन मुलं व चार मुली असा सात लोकांचा परिवार आहे. घटनेमुळे आसाणे गाव आणि तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.