नंदुरबारात वेळ संपल्यानंतरही रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 12:06 IST2019-12-24T12:06:34+5:302019-12-24T12:06:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अपेक्षेप्रमाणे शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्याने सर्वच तहसील कार्यालयांना यात्रेचे ...

The queue even after time runs out in Nandurbar | नंदुरबारात वेळ संपल्यानंतरही रांगा

नंदुरबारात वेळ संपल्यानंतरही रांगा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अपेक्षेप्रमाणे शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्याने सर्वच तहसील कार्यालयांना यात्रेचे स्वरूप आले होते. नंदुरबारात दुपारी तीन वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या परिसरात जेवढे उमेदवार उभे होते त्या सर्वांना अर्ज दाखल करण्याची संधी देण्यात आली. सायंकाळी उशीरापर्यंत अर्ज दाखल करून घेतले जात होते.
जिल्हा परिषदेच्या ५६ आणि पंचायत समितींच्चा ११२ गणांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सोमवार, २४ रोजी शेवटची मुदत होती. गेल्या सहा दिवसांपासून उमेदवारी अर्ज स्विकारले जात असले तरी इच्छूक उमेदवारांनी फारशी उत्सूकता दाखविली नव्हती. शनिवारी थोडेफार अर्ज दाखल झाले. त्यामुळे सोमवारीच प्रचंड गर्दी होण्याची शक्यता होती. अपेक्षेप्रमाणे सकाळी दहा वाजेपासूनच विविध राजकीय पक्षांच्या उमेदवाराची आणि समर्थकांची गर्दी त्या त्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालय परिसरात झाली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी बॅरेकेटींग लावण्यात आले होते.
उमेदवारी अर्ज आधी आॅनलाईन भरावे लागत होते. त्यानंतर त्याची प्रिंट काढून आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करावा लागत होता. ही प्रक्रिया अनेकांच्या पचनी पडली नाही. त्यामुळे इच्छूक उमेदवारांचा प्रचंड गोंधळ उडाला. परिणामी अनेकजण उमेदवारी अर्जापासून वंचीत राहिले किंवा भरतांना काही त्रुटी राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रांगेतील सर्वांनाच संधी
नंदुरबार येथे दुपारी अर्ज दाखल करणाऱ्यांची एकच गर्दी झाली. दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम मुदत होती. त्या वेळेपर्यंत जेवढे इच्छूक उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या आवारात होते त्या सर्वांनाच अर्ज दाखल करण्याची संधी देण्यात आली. दुपारी तीन वाजेनंतर रांगेत तब्बल ७० ते ७५ इच्छुक उमेदवार होते. परिणामी त्या सर्वांचे अर्ज दाखल करून घेण्यासाठी सायंकाळी उशीरापर्यंत प्रक्रिया सुरू होती.
दिग्गजांचा समावेश
अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये कुमुदिनी विजयकुमार गावीत, अ‍ॅड.राम चंद्रकांत रघुवंशी, संध्या वकिल पाटील, अर्चना शरद गावीत, सुशिला भरत पाटील, स्मिता दीपक दिघे, अनिल पाटील, योगिनी अमोल भारती, सुनिता रवींद्र पाटील यांच्यासह इतरांचा समावेश आहे. अनेक गटात रंगतदार लढती राहणार आहे.
पोलीस बंदोबस्त
तहसील कार्यालय आवारात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. मुख्य प्रवेशद्वारावर केवळ इच्छूक उमेदवार व त्यांच्या सोबत इतर चार ते पाच जणांनाच आत सोडण्यात येत होते. उमेदवारांच्या समर्थकांना मात्र प्रवेश द्वाराबाहेरच थांबावे लागत होते. बाहेर देखील मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता.
शक्ती प्रदर्शनाला फाटा
राजकीय पक्ष व उमेदवारांनी शक्ती प्रदर्शनाला फाटा देत उमेदवारी अर्ज दाखल केले. काही राजकीय पक्षांकडून रॅलीद्वारे अर्ज भरण्यात येतील अशी शक्यता होती. परंतु जिल्हाभरात कुणीही शक्ती प्रदर्शन केले नसल्याचे चित्र होते. परंतु समर्थकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसून येत होती. परिणामी परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.

आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरण्याच्या क्लिष्ट प्रक्रियेमुळे अनेकांच्या उमेदवारी अर्जात अनेक त्रुटी राहण्याची शक्यता आहे. परिणामी कुणी उमेदवार वंचीत राहू नये यासाठी छाननीच्या वेळी याबाबत संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आमदार राजेश पाडवी यांनी केली आहे. याबाबत आमदार पाडवी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निवडणूक आयोगाने या वर्षी आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरण्याची सक्ती केल्यामुळे आदिवासी उमेदवारांना फॉर्म भरण्यासाठी खूपच अडचणी आल्या. क्लिष्ट माहिती भरण्यासाठी सर्व उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागली. त्यामुळे बºयाच इच्छूक उमेदवारांना वंचीत राहावे लागले. अर्ज छाननी करतांना क्लिष्ट मुद्दयांकडे खूपच बारकाईने लक्ष न देता उमेदवारी करण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पहाणी करावी. आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याच्या संदर्भात राजकीय पक्षांना किंवा उमेदवारांना कोणतीही माहिती दिली गेली नाही किंवा प्रबोधन केले गेले नव्हते. यामुळे कोणताही उमेदवार निवडणुकीपासून वंचीत राहणार नाही यासाठी छाननीच्या वेळी कायदे व नियम लवचीक करावे अशी अपेक्षाही आमदार पाडवी यांनी व्यक्त केली.

Web Title: The queue even after time runs out in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.