शहाद्यात १० दुकानदारांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:50 IST2021-05-05T04:50:03+5:302021-05-05T04:50:03+5:30
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत नंदुरबार जिल्हा आणि शहादा तालुका परिसरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न वेळोवेळी करण्यात ...

शहाद्यात १० दुकानदारांवर दंडात्मक कारवाई
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत नंदुरबार जिल्हा आणि शहादा तालुका परिसरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न वेळोवेळी करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने कोरोना संसर्गाबाबत नियमांचे काटेकोर पालन करून सहकार्य करणे अपेक्षित आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात प्रशासनाला कठोर कारवाईचा बडगा उगारावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते तूप बाजार तसेच दोंडाईचा रोड ते मुख्य बाजारपेठ असा संपूर्ण बाजारपेठेचा मार्ग रोज पायीच फिरून भाजी विक्रेते व फळ विक्रेत्यांना अंतरावर उभे राहण्याच्या सूचना दिल्या. काही किराणा दुकानांमध्येही सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केले. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे निर्देश वेळोवेळी प्रशासनातर्फे देण्यात येत आहेत. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना तत्काळ सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी व पथकाने शहरातील जत्रा कापड दुकानास सील लावून कार्यवाही केली आहे. तसेच सहा किराणा दुकानांसह इतर चार दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या भरारी पथकात कार्यालयीन पर्यवेक्षक माधव गाजरे, अभियंता संदीप टेंभेकर, स्वच्छता निरीक्षक राजू चव्हाण, करनिरीक्षक राजेंद्र सैंदाणे, नगरपरिषदेतील दिलीप कोळी, पुरुषोत्तम शिवदे, सुनील भारती, चेतन गांगुर्डे, गोटूलाल तावडे, निंबा बढे, अजिंक्य डोडवे, खलील शेख, ब्रिजलाल पाटील, समीर शेख, नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली.
१५ हजार दंड वसूल...
कोरोना नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांकडून एकूण १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला गेला व यापुढे कडक कारवाई करण्यात येणार असून कारवाईचे उल्लंघन केल्यास पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत आस्थापना सील केल्या जातील. पोलिसांसोबत पालिकेची भरारी पथके तयार करण्यात येणार असून नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यात येणार आहेत. तसेच मुख्य बाजारपेठा याठिकाणची गर्दी टाळण्यासाठी संयुक्तिक कारवाई करण्यात येणार आहेत. किराणा दुकान व इतर आस्थापना याठिकाणी ५० टक्क्यांपेक्षा जास्त गर्दी असेल तर अशांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत या आस्थापना सील करण्याचा निर्णयही घेण्यात येईल. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक, फौजदारी अशा दोन्ही कारवाया करण्यात येणार आहेत, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.