जनजीवन येवू लागलेय पूर्वपदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 11:44 IST2020-06-08T11:43:54+5:302020-06-08T11:44:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमधील शिथीलतेमुळे जनजीवन टप्प्याटप्प्याने पुर्वपदावर येवू लागले आहे. तब्बल अडीच महिन्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून ...

जनजीवन येवू लागलेय पूर्वपदावर
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊनमधील शिथीलतेमुळे जनजीवन टप्प्याटप्प्याने पुर्वपदावर येवू लागले आहे. तब्बल अडीच महिन्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून मोकळी मैदाने फुलली आहेत. सकाळी व सायंकाळी व्यायाम करणारे, खेळणारे, विविध क्रिडा प्रकाराचा सराव करणारे यांची गर्दी होऊ लागली आहे. शहरापासून लांब असलेल्या तलाव, निसर्गरम्य ठिकाणीही फिरणारे दिसून येत आहे. रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे त्यात भरच पडली.
लॉकडाऊनमुळे अडीच महिन्यांपासून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच घरात बसली होती. ऐन उन्हाळ्यात घरात बसावे लागल्यामुळे सर्वचजण कंटाळली होती. कधी लॉकडाऊन शिथील होतो आणि कधी मैदानांवर खेळायला मिळते अशी आस लहानगे आणि तरुणांना लागली होती. गेल्या दोन दिवसांपासून मैदाने खेळण्यासाठी आणि व्यायामासाठी मोकळी करून देण्यात आली आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी सकाळी व सायंकाळी जॉगिंग करणारे, खेळणारे यांची गर्दी दिसून येत आहे. अर्थात सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावूनच हे सर्व होत आहे.
शाळांची आणि
सार्वजनिक मैदाने
नंदुरबारात सार्वजनिक दोन मैदाने आहेत तर शाळा, महाविद्यालयांची आठ ते दहा मैदाने आहेत. याशिवाय पालिकेच्या मोकळ्या जागांवर देखील फिरण्यासाठी सोय आहे.
अशा सर्व ठिकाणी सकाळी पाच वाजेपासूनच जॉगिंग करणारे, व्यायाम करणारे दिसून येत आहे. रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. त्यात युवकांचा भरणा सर्वाधिक होता. सध्या शाळा, महाविद्यालये बंद, परीक्षाही नाही त्यामुळे युवकांमध्ये खेळण्याविषयी मोठा उत्साह आहे.
शिवाय दोन, अडीच महिन्यानंतर ते उपलब्ध होत असल्याने युवकांची गर्दी अशा ठिकाणी होत आहे. शहरातील कचेरी मैदान, ग्यारा मील कंपाऊंड मैदान यासह जिल्हा क्रिडा संकुल, यशवंत विद्यालय, जीटीपी महाविद्यालय, पी.के.अण्णा पाटील विद्यालयाच्या मैदानांवर ही गर्दी पहावयास मिळत आहे. याशिवाय पालिकेच्या मोकळ्या भुखंडांवरील मैदाने देखील युवकांना खेळण्यासाठी उपयुक्त आहेत.
ट्रॅकींगसह व्यायाम
याशिवाय शहरातील वाघेश्वरी देवी मंदीरामागील टेकडी, जिल्हा क्रिडा संकुलासमोरील टेकडी या ठिकाणी देखील ट्रॅकींग करीत व्यायाम करणाऱ्यांची गर्दी असते. काहीजण शहरानजीकच्या जिल्हा कारागृहासमोरील आणि दुधाळे शिवारातील टेकडींवर देखील जॉगिंग आणि ट्रेकींगसाठी जात असल्याचे चित्र आहे.
उद्याने मात्र बंदच
संपुर्ण लॉकडाऊनमध्ये उद्याने बंदच ठेवण्यात आली आहेत. आताही उद्याने सुरू करण्यास मनाई आहे. त्यामुळे सुट्टीमुळे कंटाळलेले आणि गावीही न जाता आल्याने बाळगोपाळ मंडळी उद्याने सुरू होण्याची वाट पहात आहेत. परंतु आता पावसाळा सुरू होणार असल्यामुळे उद्याने सुरू होऊनही उपयोग होणार नसल्याची स्थिती आहे.
गल्ली खेळही रंगताहेत
सध्या बाजारपेठची वेळ ही सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे. शिवाय संचारबंदीची वेळही रात्री ९ वाजेपासून आहे. त्यामुळे सायंकाळी शहरातील गल्लीबोळात क्रिकेट, बॅडमिंटनसह इतर खेळ रंगताहेत. त्यात कुटूंबातील सर्वच सदस्य सहभागी होत आहेत.
मॉल, चित्रपट गृहे, हॉटेल, मंगल कार्यालये, सार्वजनिक कार्यक्रम सुरू झाल्यास चैतन्यात आणखी भर पडणार आहे. आता पुढच्या टप्प्यात त्यात किती शिथीलता मिळते याकडे लक्ष लागून आहे.
एकुणच जिल्ह्यातील परिस्थिती लॉकडाऊननंतर सर्वसामान्य होत आहे. लोकांमध्ये उत्साह संचारलेला आहे. बाजारपेठेतही गर्दी राहत आहे. खरीप हंगामाच्या तोंडावरच व्यवहार पूर्वपदावर येवू लागल्याने बळीराजाही सुखावला आहे.
बाजारपेठाही आता हळूहळू पूर्वपदावर आल्या आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत बाजारपेठा सुरू राहत आहेत. सकाळपासूनच खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या जीवात जीव आला आहे. सराफा बाजार, इलेक्ट्रॉनिक वस्तू, चैनिच्या वस्तू यासाह कापड बाजारात गर्दी होत आहे. घरगुती स्वरूपात लग्नकार्य होत असल्यामुळे त्यासाठी लागणाºया वस्तूंच्या खरेदीसाठीही ग्रामिण भागातील जनता गर्दी करीत आहे.