रेल्वेचा अंडरपास दुहेरी मार्ग तातडीने पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:09 IST2021-02-05T08:09:20+5:302021-02-05T08:09:20+5:30
नंदुरबार : शहरातील नळवा रस्त्यावरील रेल्वेच्या अंडर बायपास दुहेरी मार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे व शहरातील रहदारीची समस्या सोडवावी, ...

रेल्वेचा अंडरपास दुहेरी मार्ग तातडीने पूर्ण करा
नंदुरबार : शहरातील नळवा रस्त्यावरील रेल्वेच्या अंडर बायपास दुहेरी मार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे व शहरातील रहदारीची समस्या सोडवावी, अशी मागणी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महाव्यवस्थापक मंगळवारी नंदुरबारात आले असता त्यांना नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, राज्य शासनाने अर्थसंकल्पात नंदुरबार शहरामधून जाणाऱ्या अंडर बायपास दुहेरी मार्गाला मंजुरी दिली होती. त्या बाबीला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. राज्य शासनाने दीड कोटी रुपये रेल्वेकडे वर्गदेखील केले. परंतु रेल्वेने ते काम पूर्ण केलेले नाही. अंडर बायपास दुहेरी मार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. जिल्ह्यातील रेल्वे विभागाचे इतर कामे प्राधान्याने होत असून शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाचा अंडर बायपास दुहेरी मार्गाच्या कामाला इतका उशीर का लागतोय हा प्रश्न शहरवासीयांपुढे आहे. शहराची वाढती लोकसंख्या पाहता एकेरी मार्गामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असल्याने अडचणी निर्माण होत आहे. दुहेरी मार्गाचे काम लवकर पूर्ण झाल्यास ही अडचण दूर होणार आहे.
याबाबत तातडीने निर्णय घेऊन अंडर बायपास दुहेरी मार्गाचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी या निवेदनात रत्ना रघुवंशी यांनी केली आहे.