प्रकल्प अधिकाऱ्यांनीच विद्यार्थ्यांना दिले बीजगणिताचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:20 IST2021-02-19T04:20:41+5:302021-02-19T04:20:41+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील सात-आठ महिन्यांपासून सर्व शाळा-महाविद्यालये बंद होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना पाळून शाळा-महाविद्यालये ...

प्रकल्प अधिकाऱ्यांनीच विद्यार्थ्यांना दिले बीजगणिताचे धडे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील सात-आठ महिन्यांपासून सर्व शाळा-महाविद्यालये बंद होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना पाळून शाळा-महाविद्यालये सुरू करण्यास नुकतीच परवानगी दिली आहे. आदिवासी विकास विभागानेही आश्रमशाळा सुरू केल्या असून विद्यार्थ्यांच्या निवासाचे व वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान आश्रमशाळा प्रशासनापुढे आहे. या पार्श्वभूमीवर तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा हे अक्कलकुवा तालुक्यातील डाब येथे गेले असता त्यांनी येथील शासकीय आश्रमशाळेला भेट दिली.
या भेटीदरम्यान त्यांनी शाळेत केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेत शाळेत सध्या असलेली अध्ययन-अध्यापनाच्या प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. वर्गात जाऊन शिक्षक शिकवत आहेत किंवा नाही याबाबत सविस्तर माहिती घेतली व अभ्यासक्रम वेळेत कसा पूर्ण करता येईल. त्याबाबत तत्काळ नियोजन करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. एवढ्यावरच न थांबता प्रकल्प अधिकारी पंडा यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना स्वतः बिजगणित विषयाचे २० मिनिट अध्यापन केले. काही उदाहरणे शिक्षकांकडून सोडवून घेतले. काही समीकरणे विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी दिली.
प्रकल्प अधिकाऱ्यांनी अनपेक्षितपणे हातात पुस्तक व खडू घेत शिक्षकाची भूमिका घेत विद्यार्थ्यांना अध्यापन केल्याने अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. या वेळी सहायक प्रकल्प अधिकारी अमोल मेटकर, शिक्षण विस्तार अधिकारी जी.डी. अखडमल, बबन मुंगळे, डाब शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक के.सी. कोकणी आदींसह आश्रमशाळेचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा यांनी सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवत विद्यार्थ्यांना बिजगणित विषय शिकवला. सोप्या भाषेत त्यांनी विद्यार्थ्यांना समीकरणे सोडवून दाखविले. स्वतः प्रकल्प अधिकारीच शिकवत असल्याने विद्यार्थ्यांमध्येही उत्साह व चेहऱ्यावर आनंद दिसून आला. शाळेत असताना कोणत्याही प्रकारची अडचण किंवा समस्या निर्माण झाल्यास प्रकल्प कार्यलयाशी संपर्क साधून त्या तत्काळ सोडवाव्यात व अध्ययन-अध्यापन प्रक्रिया कोणत्याही कारणाने खंडित होऊ देऊ नका, असे त्यांनी याप्रसंगी विद्यार्थी व आश्रमशाळा प्रशासनाला सांगितले.