जिल्ह्यात दोन केंद्रांवर पावणेदोन लाख क्विंटल कापूस खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:29 IST2021-05-17T04:29:02+5:302021-05-17T04:29:02+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात नंदुरबार व शहादा येथील कापूस खरेदी केंद्रांवर एकूण पावणेदोन लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात ...

जिल्ह्यात दोन केंद्रांवर पावणेदोन लाख क्विंटल कापूस खरेदी
नंदुरबार : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात नंदुरबार व शहादा येथील कापूस खरेदी केंद्रांवर एकूण पावणेदोन लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली. यंदा मात्र मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कापूस खरेदी बंद करण्यात आली. यंदा किमान ४२०० ते कमाल ५६०० रुपये क्विंटलला भाव मिळाला होता.
नंदुरबार जिल्ह्यात सीसीआयचे नंदुरबार व शहादा येथे खरेदी केंद्र होते. बाजार समितींच्या माध्यमातून या ठिकाणी कापूस खरेदी केली गेली. नंदुरबारात दोन जिनिंग असून शहाद्यात पाच आहेत. दोन्ही ठिकाणी दरवर्षी सारखीच कापूस खरेदी केली जात असते. नंदुरबार येथील खरेदी केंद्रात जवळपास ९५ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली. शहादा केंद्रात देखील ९० हजार क्विंटलच्या आसपास खरेदी केली आहे. कापसाला प्रतवारीनुसार यंदा किमान ४२०० ते कमाल ५६०० रुपये क्विंटलला भाव मिळाला. भाव चांगला असल्याने यंदा शेतकऱ्यांनी कापूस घरात पडू न देता लागलीच विक्री केली. दोन्ही ठिकाणी मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खरेदी सुरू राहिली.
गेल्यावर्षी शेतकऱ्यांना मात्र वाईट अनुभव आला होता. भाव वाढेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस विक्री केली नव्हती. त्यातच मार्च २०२० मध्ये लॅाकडाऊन सुरू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेकडो क्विंटल कापूस घरातच पडून राहिला. त्यामुळे शासनाला वेगळे आदेश काढून मे व जून महिन्यात पुन्हा कापूस खरेदी केंद्र सुरू करावे लागले होते. यंदा मात्र ती परिस्थिती उद्भवली नाही.