पूर्व भागात वीज पुरवठ्याचा प्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:31 IST2021-02-13T04:31:10+5:302021-02-13T04:31:10+5:30
नंदुरबार : तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये चांगल्या दर्जाचे ट्रान्सफाॅर्मर्स दिले जात नसल्याने शेती व गावठाणसाठीचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत ...

पूर्व भागात वीज पुरवठ्याचा प्रश्न गंभीर
नंदुरबार : तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये चांगल्या दर्जाचे ट्रान्सफाॅर्मर्स दिले जात नसल्याने शेती व गावठाणसाठीचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याकडे वीज कंपनीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थ वारंवार पाठपुरावा करुनही नादुरुस्त ट्रान्सफाॅर्मर्स बदलले जात नसल्याचे चित्र आहे.
बाजारात द्राक्षांची आवक वाढली
नंदुरबार : नाशिक जिल्ह्यातून होणारी द्राक्षांची आवक वाढली आहे. यामुळे बाजारात हिरवेगार द्राक्ष दिसून येत आहेत. गेल्या वर्षी लाॅकडाऊनमुळे फारच कमी वेळ द्राक्षांचा आस्वाद घेता आला होता. यंदा मात्र आवक अधिक असल्याने खवय्येही त्यांची खरेदी करत आहेत.
वीज कंपनीच्या मोहिमेचा नागरिकांना त्रास
नंदुरबार : वीज वितरण कंपनीकडून सध्या थकीत वीज बिल वसुलीची मोहिम सुरू आहे. या मोहिमेंतर्गत बिल न भरणाऱ्या ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. कंपनीची कारवाई ही नियमाला धरून असली तरीही अनेकवेळा वायरमन ग्राहकांना कोणतीही विचारणा न करताच वीजपुरवठा बंद करत असल्याचे प्रकार होत आहे. दुपारच्या वेळी घरातील कर्ते पुरुष नोकरी व्यवसायाला बाहेर असताना ह्या कारवाया होत आहेत.
बाजारात गर्दी
नंदुरबार : शहरात सराफ बाजारासह कापड विक्रेत्यांकडे गेल्या चार दिवसांपासून गर्दी आहे. विवाहांचे मुहूर्त पुन्हा सुरू झाल्याने बाजारपेठेत गजबज वाढली आहे. १४ फेब्रुवारी रोजी अनेकांचे विवाह असल्याने त्यानिमित्त खरेदीसाठीही अनेकजण बाजारात येत असल्याचे दृश्य दिसून येत आहे.
नागरीक त्रस्त
नंदुरबार : तालुक्यातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून डास व मच्छरांचा त्रास वाढला आहे. याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही धूर फवारणी, गटारींची स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. याबाबत पंचायत समितीने ग्रामीण भागात सूचना करण्याची गरज आहे.
ग्रामीण भागात राजकीय चर्चांना उधाण
नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागात शुक्रवारी ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व उपसरपंच निवड कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमांतर्गत सभा घेत कामकाज पूर्ण करण्यात आले. एकीकडे ही निवड सुरू होण्याआधी कोण सरपंच व कोण उपसरपंच होणार याच्या चर्चा रंगत होत्या. निवडणूक बिनविरोध होणार असे स्पष्ट असतानाही राजकारण रंगवले जात असल्याचे चित्र दिसून आले.
महामार्ग दुरुस्तीच्या कामाला आला वेग
नंदुरबार : शेवाळी ते नेत्रंग महामार्गाच्या दुरुस्तीचे काम वेगात सुरू करण्यात आले आहे. याबाबत लोकमतने सातत्याने पाठपुरावा करत वृत्त प्रकाशित केले हाेते. याची दखल घेत या कामांना महामार्ग विभागाने गती दिली आहे. तळोदा ते अक्कलकुवा आणि अक्कलकुवा ते गुजरात हद्दीपर्यंतचे रस्ता काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. रस्त्यावरचे खड्डे बुजवले गेल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.