शाळा, महाविद्यालयांसह खाजगी क्लासेसही बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:07 IST2020-03-16T12:07:50+5:302020-03-16T12:07:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना अर्थात कोव्हीड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत हद्दीतील ...

शाळा, महाविद्यालयांसह खाजगी क्लासेसही बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोना अर्थात कोव्हीड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत हद्दीतील सर्व अंगणवाडी, शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी काढले आहेत. दरम्यान, ग्रामिण भागातील सर्व अंगणवाडी, शाळा, महाविद्यालये नियमित सुरू राहणार आहेत.
कोरोनाची भितीमुळे शाळा, महाविद्यालयांधील उपस्थितीवर परिणाम झाला आहे. या आजाराची साथ अधीक पसरू नये यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा निर्गमीत करण्यात आला आहे. या कायद्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व अंगणवाडी, खाजगी व सरकारी प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये तसेच खाजगी स्वरूपात घेण्यात येणारे सर्व क्लासेस हे ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
या काळात दहावी व बारावीच्या पूर्व निर्धारित परीक्षा सुरू राहणार आहेत. शाळा, महाविद्यालयांमधील कार्यालयीन कामकाज देखील नियमित सुरू राहणार आहे. खाजगी क्लास चालकांनी आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी रविवार, १५ रोेजी दुपारी काढले.
यामुळे शाळांनी लागलीच आपापल्या सोशल मिडिया गृपवर ही बाब विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.
सिनेमागृहे देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून सर्वच शासकीय, निमशासकीय सार्वजनिक कार्यक्रम या काळात रद्द करण्यात आले आहेत.
दरम्यान, नागरिकांनी या साथरोगासंदर्भात घाबरून जाण्याचे कारण नाही. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग यांनी योग्य त्या सर्व उपाययोजना केलेल्या आहेत. दक्षता घेतली जात आहे.
४३१ मार्च पर्यंत शाळांना सुट्टीचा निर्णय हा आश्रमशाळांबाबत लागू केला नाही. शहरी व ग्रामिण भागात आश्रमशाळा आहेत. तेथे शेकडो विद्यार्थी एकत्र राहतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांबाबत दक्षता पाळण्याच्या ुसुचना यापूर्वीच आदिवासी प्रकल्प कार्यालयातर्फे आपल्या आश्रमशाळा व्यवस्थापनांना देण्यात आल्या आहेत.
४शहरी भागातील होस्टेल मात्र ओस पडण्याची शक्यता आहे. कारण शहरी भागातील शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे वसतिगृहे देखील खाली होणार आहेत. त्यामुळे आश्रम शाळांबाबतच्या निर्णयाकडे आता शिक्षण विभागाचे लक्ष लागून आहे.