रासायनिक खतांचे भाव गगनाला; शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:29 IST2021-05-14T04:29:56+5:302021-05-14T04:29:56+5:30
ब्राह्मणपुरी : खरीप हंगाम अवघ्या अडीच महिन्यावर आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीतील मशागतीची कामे सुरू केली आहे. प्रमुख रासायनिक खतांचे ...

रासायनिक खतांचे भाव गगनाला; शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार
ब्राह्मणपुरी : खरीप हंगाम अवघ्या अडीच महिन्यावर आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीतील मशागतीची कामे सुरू केली आहे. प्रमुख रासायनिक खतांचे दर गगनाला भिडले आहेत. परंतु शेतमालाला मिळणारा भाव बघता हा भाव शेतकऱ्यांना परवडणारा नाही. यावर्षी रासायनिक खतांचे भाव शेतकऱ्यांना शासनामार्फत पूर्वसूचना न देता वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.
शहादा तालुक्यात खरीपाची पेरणी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होते. तत्पूर्वी, शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील काड्या, फने, नांगरणी, वखरणी यासारखी उन्हाळ्यात करण्यात येणारी कामे करायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांची वेळेवर धांदल होऊ नये म्हणून मे महिन्याच्या अखेरीस बी-बियाणे, खते खरेदी करून ठेवतात. त्यामुळे दुकानदारांनी खते व बी-बियाणेची संबंधित कंपनीकडे नोंदणी करून ठेवली आहे. शेतकरी डीएपी हे खत मोठ्या प्रमाणात पिकांना देतात. यावर्षी खताचे भाव वाढल्याने खत मिळेल की, नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. डीएपी इफ्को या खताला ७०० ते ८०० रुपये अधिक मोजावे लागणार.
गतवर्षी डीएपी खताच्या किमती १२०० रूपये प्रति बॅग होती. यावर्षी १९०० रुपये झाली आहे. तसेच दरात परत वाढ होण्याचे चित्र दिसत आहे. शेतकऱ्यांना प्रतिबॅग ७०० ते ८०० रूपये अधिक मोजावे लागणार आहेत. डीएपीसोबत इतर सर्वच मिश्र खतांच्या किमती वाढल्या आहेत. सुपर फास्फेट पोटॅश आदी खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. वर्षभरात कपाशी पिकाला-तीन वेळा खत द्यावे लागते. सोयाबीन पिकाला एकरी एक बॅग खताची आवश्यकता असते. खताच्या किमतीत सरासरी १५ ते १७ टक्के वाढ झालेली असून, या भाववाढीचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
खतासोबत कीटकनाशकांचीही दरवाढ
खताच्या किमतीसोबतच तणनाशक, कीटकनाशक यांच्या भावातदेखील वाढ झाली आहे. एकूणच उत्पादन खर्च वाढणार आहे आणि शेतमालाचे भाव या तुलनेने कमी वाढत आहे. शिवाय नैसर्गिक संकटाचा फटका पिकांना बसत असतो. येणारे उत्पन्न आणि होणारा खर्च याचा ताळमेळ बसवताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागणार आहे. इंधन दरवाढीमुळे मशागतीचे दर वाढले आहेत. गेल्या काही दिवसापासून पेट्रोल-डिझेलचे भाव दररोज वाढत आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर मालकांनी आपले दर देखील वाढवले आहेत. अंतर मशागतीचा खर्च सरासरीपेक्षा दीडपटीने वाढला आहे. बहुतेक शेतकरी आता आंतर मशागत नांगरणी, फंटण, रोटावेटर, पणजी आदी कामे ट्रॅक्टरने करतात. पण आता भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे बजेट कोलमडणार आहे.
शेतकऱ्यांचे उत्त्पन्न डबल करण्याची घोषणा हवेतच
सरकारने शेतकऱ्यांचे उत्त्पन्न डबल कसे होईल यासाठी खतांच्या किमतीत वाढ होणार नाही असे आश्वासन देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मंत्री मनसुख माडेवीया यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रासायनिक खतांची भाववाढ होणार नाही असे स्पष्टीकरण देण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु शेतकरी खत घेण्यासाठी खतांच्या दुकानावर गेल्यावर भाववाढ झाल्याचे समजत आहे. त्यामुळे सरकारची शेतकऱ्यांचे डबल उत्त्पन्न करण्याची घोषणा हवेतच विरल्याचे दिसून येत आहे. खतांची दरवाढ केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटास सामोरे जावे लागत असल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे.
खताचे पूर्वीचे व आताचे दर
१०-२६-२६ ईफको- १,१७५- नवेदर १,७७५
१०-२६-२६ महाधन-१,३३०ते १,५५०- नवे दर १,९२५
डीएपी इफको १,२०० नवे दर १,९००
डीएपी आयपीएल १,२०० नवे दर १,९००
२४-२४-०० महाधन १,२८० १,५५० नवे दर १,९००
२०-२०-००-१३ कृभको १,००० नवेदर १,४००
पोटेश आयपीएल,चंबल- ८७५ नवेदर १,०००
खताचे भाव अचानक वाढल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत सापडला असून, संबंधित काही दुकानदार हे खत चढ्या भावाने विक्री करीत आहेत. तरी संबंधित प्रशासनाने खत विक्री दुकानात खतांचे किमतीचे दरफलक लावावे जेणेकरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही. -डॉ.किशोर पाटील, भाजप किसान प्रदेश सदस्य
संबंधित खत कंपन्याकडून खतांच्या किमती वाढवण्यात आल्या असून, या नव्या दरात खरेदी केली तर आमचा व्याजाचा परतावा देखील निघणार नाही. शासनाने सांगितले होते की, दरवाढ होणार नाही पण तसे चित्र काही दिसून येत नाहीय. -जितेंद्र पाटील खत विक्रेता शहादा