मान्सून जवळ येत असल्याने खरीप हंगामाची तयारी जोरदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:28 IST2021-05-15T04:28:56+5:302021-05-15T04:28:56+5:30
हवामान खात्याने यावर्षी चांगला मान्सून होणार असल्याचे तसेच मान्सून वेळेवर दाखल होईल, असे भाकीत वर्तविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा ...

मान्सून जवळ येत असल्याने खरीप हंगामाची तयारी जोरदार
हवामान खात्याने यावर्षी चांगला मान्सून होणार असल्याचे तसेच मान्सून वेळेवर दाखल होईल, असे भाकीत वर्तविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, खरीप पिकासाठी शेती मशागतीच्या कामांना वेग आलेला आहे. यामध्ये मूग, उडीद, बाजरी, तूर, सोयाबीन, भुईमूग यासारखी पिके पेरण्यासाठीची मशागत तसेच कापूस, मका लागवडीसाठीची मशागत करताना शेतकरी दिसत आहे.
ज्या शेतकऱ्यांनी महिनाभरापूर्वी नांगरणी केली होती, असे शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटाव्हेटर मारताना दिसून येत आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी भुईमूग, बाजरी पिकाची पेरणी तसेच टरबूज व खरबूज पिकाची लागवड केली होती, असे शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी करताना दिसून येत आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून पावसाळा चांगला होत असल्याने यावर्षीही चांगला होईल म्हणून आतापासूनच शेतकरी बियाण्यांची जुळवाजुळव करीत असल्याचे चित्र आहे. तालुक्यात खरीप हंगामात सर्वाधिक पेरणी मूग पिकाची होत असते. त्याखालोखाल मका आणि कापूस पिकाची लागवड होत असते. बहुतांश शेतकऱ्यांनी मजूर टंचाई होत असल्याने ऊस व केळी पिकाची लागवड केल्याचे दिसत आहे.
सध्या शेतात काहीच नसून खरीप हंगामातील जमिनीची मशागत चालू आहे. तसेच लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे बंद पडल्यामुळे तूर्तास तरी सर्व मजुरांना काम नसून केव्हा मान्सून चालू होईल आणि हाताला काम मिळेल याची वाट मजूर वर्ग पाहत आहे. तर शेतकरी आपल्या जमिनीची मशागत चांगल्या प्रमाणे सुपीक कशी होईल याकडे लक्ष देत आहेत. ट्रॅक्टर मशागतीच्या दरात वाढ, बी-बियाणे, खते यांच्या दरात झालेली वाढ त्यामुळे भांडवली खर्च आणि उत्पादन यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी दिवसेंदिवस आर्थिक संकटात सापडत आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.