रासायनिक खतांचे दर परवडत नसल्याने शेणखताला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:29 IST2021-05-23T04:29:21+5:302021-05-23T04:29:21+5:30
जयनगर : शहादा तालुक्यात काळी कसदार जमीन आहे. जमिनीत पाण्याचे प्रमाणही चांगले असल्याने निम्म्यापेक्षा अधिक जमीन ओलिताखाली आहे; पण ...

रासायनिक खतांचे दर परवडत नसल्याने शेणखताला प्राधान्य
जयनगर : शहादा तालुक्यात काळी कसदार जमीन आहे. जमिनीत पाण्याचे प्रमाणही चांगले असल्याने निम्म्यापेक्षा अधिक जमीन ओलिताखाली आहे; पण वर्षानुवर्षांपासून रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची पोत खराब झाल्याने तसेच शेतमालाला मिळत असलेल्या दरामुळे रासायनिक खते न परवडणारे आहे. शिवाय उत्पादन घटत असल्यामुळे सध्या तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी आपल्या शेतामध्ये शेणखत टाकताना दिसून येत आहे.
शेतकरी वर्षानुवर्षांपासून शेणखताऐवजी रासायनिक खतांचा वापर करताना दिसून येत आहेत. रासायनिक खतामुळे जमिनीची पोत बिघडली असून, रासायनिक खताचे दर सध्या शेतीसाठी परवडत नाहीत. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खत, गांडूळ खत, जैविक खते वापरली जातात. जुने ते सोने या उक्तीनुसार सगळ्या शेतकऱ्यांना शेणखताचा वापर करावाच लागणार आहे.
शेणखत तयार करण्यासाठी चारा एका खड्ड्यात कुजण्यासाठी टाकला जातो. सोबत जनावरांचे शेणही त्या खड्ड्यात टाकले जाते. पावसाळ्यात चारा व शेणखत कुजून त्याचे उत्कृष्ट शेणखत खड्ड्यात तयार होत असते. हेच शेणखत मे महिन्यात शेतकरी आपल्या शेतात ज्यांच्याकडे बैलजोडी आहे ते शेतकरी बैलजोडीच्या साहाय्याने तसेच बहुतेक शेतकऱ्यांकडे बैलजोडी नसल्याकारणाने ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेणखत टाकताना दिसून येतात.
ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःचा शेणखताचा उकिरडा नाही ते शेतकरी ज्या व्यक्तींकडे जनावरांची संख्या अधिक आहे, त्यांच्याकडून शेणखत विकत घेताना दिसून येत आहेत. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडल्याने तसेच पिकांना विविध रोगांच्या प्रादुर्भावाला सामोरे जावे लागत असल्याने पारंपरिक शेणखताची शेतकऱ्यांना आठवण होत आहे; परंतु शेणखताचा तुटवडा ही मोठी समस्या सध्या शेतकऱ्यांना जाणवत आहे. कारण पूर्वी जवळ - जवळ सगळेच शेतकरी बैलजोडीचा वापर करत होते. तसेच प्रत्येकाकडे गायी, म्हशी, शेळी यासारखी जनावरे दिसत होती. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याकडे शेणखताचा उकिरडा हमखास असायचा. मात्र आता शेतीची मशागत करण्यासाठी आधुनिक यंत्रांची निर्मिती झाल्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांनी बैलजोडी विकून ट्रॅक्टरला अधिक पसंती दिल्याचे दिसते. म्हणून शहादा तालुक्यातील अनेक शेतकरी परिसरात अनेक ठिकाणी काठेवाडी लोकांकडून शेणखताचा एका टॉलीला दोन हजार ते अडीच हजार रुपये असा दाम देऊन शेण खत विकत घेऊन आपल्या शेतात टाकताना दिसून येत आहे.
रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिवापराने मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. शेणखतामध्ये नत्र, स्फुरद, पालाश असते. मातीतील जैविक घटकांच्या वाढीसाठी चांगले कुजलेले शेणखत फायदेशीर असते. त्यामुळे जमिनीची पोत सुधारून उत्पादनात वाढ होते.
ग्रामीण भागात जनावरांची संख्या कमी झाल्याने शेणखताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रासायनिक खताचे दर परवडत नसल्याने तसेच रासायनिक खताच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शेणखतामुळे उत्पादन वाढून जमिनीची पोत सुधारण्यास मदत होत असते.
- चिंतामण धुडकुगीर गोसावी, शेतकरी, जयनगर, ता. शहादा