वीज बिल थकल्याने पालिकेच्या कूपनलिकांचा वीज पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:56 IST2021-03-13T04:56:43+5:302021-03-13T04:56:43+5:30
तळोदा पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे एकूण ४४ लाख ३६ हजार इतकी थकबाकी आहे. याबाबत २१ जानेवारी रोजी बिल भरण्याची ...

वीज बिल थकल्याने पालिकेच्या कूपनलिकांचा वीज पुरवठा खंडित
तळोदा पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे एकूण ४४ लाख ३६ हजार इतकी थकबाकी आहे. याबाबत २१ जानेवारी रोजी बिल भरण्याची अखेरची तारीख होती; मात्र पालिकेने वीज बिल भरले नव्हते. याबाबत विद्युत वितरण विभागाकडून पालिकेला एकदा स्मरण पत्रदेखील देण्यात आले होते, तरी ही बाब पालिकेने गांभीर्याने न घेत थकबाकी भरली नाही, त्यामुळे शहरातील ठाणेदार गल्ली, मराठा चौक, शनी गल्ली, विद्यानगरी, मोठा माडीवाडा, दत्त कॉलनी, काकशेठ गल्ली, खान्देशी गल्ली, गणपती गल्ली, शहराला पाणी पुरवठा करणारे मुख्य स्रोत, दत्त कॉलनी, भोई गल्ली, कुंभार गल्ली, मल्लकवाडा, रामगड यांसह एकूण २२ ठिकाणचा पाणी पुरवठा करणाऱ्या कुपनलिकांचा वीज पुरवठा शुक्रवारी खंडित केला.
नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे महावितरणची विजेची ४४ लाखांची रक्कम थकीत आहे. हे थकीत बिल वेळेत न भरल्याने अखेर महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली. अचानक सकाळपासून वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासून हाल झाले. अनेकांनी शुक्रवारी दिवसभर पाण्याच्या ड्रमवर तहान भागवली. नगरपालिकेकडे गेल्या अनेक दिवसांपासून ही थकबाकी आहे. थोडी थोडी रक्कम वीज बिलापोटी भरली जात असे; परंतु ही थकबाकी वाढत जाऊन ती ४२ लाखांपर्यंत पोहोचल्यामुळे वीज पुरवठा खंडित केल्याचे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता चहांदे यांनी सांगितले. तळोदा पालिकेचे उत्पन्न कमी असून, नागरिकांकडे पाणीपट्टी, घरपट्टी व इतर कर बाकी असून, पालिका वसुली करण्यात कमी पडल्याचे बोलले जाते; मात्र आर्थिक नियोजन करण्यात पालिका कमी पडल्यानेच आज ही नामुष्की पालिकेवर ओढवल्याची चर्चा दिवसभर शहरात होती.
ग्रामीण भागातही कारवाई
ग्रामीण कक्षात पाणी पुरवठा विभागाकडे अंदाजित ८८ लाख एवढे एकूण थकीत बिल भरणा आहे. याबाबत वेळोवेळी संबंधिताना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तरीही बिले न भरल्याने शुक्रवारी दिवसभरात ग्रामीण भागातील आमलाड, बेलीपाडा, गणेश बुधावल, भवर, राजविहीर, सरदारनगर, रेवानगर, झिरी, पाथडी, भाबलपूर, वाल्हेरी, सिंगपूर, शिर्वे अशा एकूण २० ठिकाणचा पाणी पुरवठ्याचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर बोरद गटात १७ कुपनलिकांची जोडणी असून, अंदाजित ७० लाख एवढे थकीत आहेत. त्यापैकी शुक्रवारी दिवसभरात अलवान, मोहिदा, खर्डी, बंधारा, मोठा धनपूर अशा पाच ठिकाणचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
पाच ठिकाणच्या कूपनलिकांचा वीज भरणा एकूण रक्कम आठ लाख ४१ हजार एवढा भरणा केला जाणार आहे. त्या अनुषंगाने या पाचही ठिकाणचा वीज पुरवठा सुरळीत केला जाणार आहे. उर्वरित थकीत रक्कमही लवकरच भरणा केली जाणार आहे. नागरिकांनी पाणीपट्टी भरून सहकार्य करावे.
-सपना वसावा, मुख्याधिकारी, नगरपालिका, तळोदा
नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे ४४ लाख एवढी रक्कम थकीत आहे. याबाबत संबंधित प्रशासनास लेखी नोटीस बजावूनही वीज बिलाचा भरणा न झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला. बिले भरल्याशिवाय वीज पुरवठा सुरू करता येणार नाही.
-पी.वाय. चहांदे, उपकार्यकारी अभियंता, वीज कंपनी, तळोदा.
एकूण पाणी पुरवठा थकीत रक्कम
अर्बन ४४ लाख ३६ हजार
बोरद गटात ७० लाख
ग्रामीण कक्ष ८८ लाख
शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य कूपनलिका दोन लाख आठ हजार
गुरांच्या दवाखान्याजवळील परिसर असलेली कूपनलिका एक लाख ७८ हजार
उपजिल्हा रुग्णालय परिसरातील एक लाख ४७ हजार
विद्यानगरी परिसर एक लाख ४८ हजार
शनि गल्ली परिसरात एक लाख ५८ हजार
असा एकूण आठ लाख ४१ रुपयांचा भरणा शुक्रवारी सायंकाळी सात वाजता पालिकेने केला आहे.