तोरणमाळ पर्यटनस्थळाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:38 IST2021-02-17T04:38:06+5:302021-02-17T04:38:06+5:30
तोरणमाळ हे राज्यातील नंबर दोनचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. येथील निसर्गरम्य वातावरणाने पर्यटकांना चांगलीच भुरळ घातली आहे. ...

तोरणमाळ पर्यटनस्थळाची दुरवस्था
तोरणमाळ हे राज्यातील नंबर दोनचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. येथील निसर्गरम्य वातावरणाने पर्यटकांना चांगलीच भुरळ घातली आहे. त्यामुळे साहजिकच एक-दोन दिवसांच्या निसर्ग पर्यटनासाठी पर्यटक येथे येत असतात. तथापि, गेल्यावर्षी कोरोना महामारीने संपूर्ण जगातच धुमाकूळ घातला होता. परिणामी शासनाच्या लाॅकडाऊनमुळे पर्यटन स्थळांना फटका बसला होता. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढून नये म्हणून पर्यटनस्थळेही बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता कोरोनाचा प्रभाव कमी व्हायला लागल्याने शासनाने पर्यटनस्थळे खुली केली आहेत. साहजिकच जिल्ह्याबरोबरच जवळील गुजरात व मध्य प्रदेश सीमेवरील पर्यटक कोरोना काळातील कंटाळवाणा घालवण्यासाठी तोरणमाळ येथे निसर्ग पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी हजेरी लावत आहेत. विशेषत: जिल्ह्यातील जे नागरिक, विद्यार्थी परदेशात देशात होते परंतु कोरोनामुळे आपल्या गावात सध्या वास्तव्यास आहेत असे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत. मात्र येथे आल्यानंतर येथील सर्वच पॉईंटसची अवस्था पहिल्यानंतर मोठे विदारक चित्र दिसून येत असल्याने त्यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जवळपास सर्वच ठिकाणी कठडे तुटले आहेत. केव्हा खाईत तोल जाईल याची शाश्वती नाही. त्यामुळे ते पॉईंट अत्यंत धोकादायक ठरले आहेत. अंतर्गत रस्त्यांचीदेखील अक्षरशः चाळण झाली आहे. पुलाचीही दुरवस्था झाली आहे. वास्तविक या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी मोठा वाव आहे. कारण महाबळेश्वर, माथेराननंतर तोरणमाळच उंच स्थानावर आहे. शिवाय गुजरात, मध्य प्रदेशमधील पर्यटकांना जवळचे ठिकाण आहे. त्यामुळे पर्यटकांची वर्दळ वाढू शकते. परंतु विकासाबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधींनी उदासीन भूमिका घेतल्याने विकासापासून कोसो दूर आहे.
बॉटनीकल गार्डनमधील वनस्पती करपल्या
वनविभागाने वनौषधींसाठी जतन केलेल्या बॉटनीकल गार्डनमधील वनस्पती पाण्याअभावी करपत आहेत. तेथील रस्त्यावरील फरशादेखील पूर्णत: उखडल्या आहेत. स्वच्छताही केली जात नाही. एकेकाळी घनदाट जंगलांनी वेढलेला तोरणमाळ आता भकास दिसत असल्याची व्यथा काही पर्यटकांनी बोलून दाखवली आहे. इतर पॉईंटसचीही दुरवस्था झाली आहे. सीताखाई व इतर खोल दरीच्या ठिकाणी असलेले संरक्षक कठडे तुटल्याने ते धोकादायक बनले आहे.
कोरोना महामारीमुळे गावाकडे आली होती. शासनाने पर्यटनस्थळे खुली केल्यामुळे एका दिवसाच्या पर्यटनासाठी तोरणमाळ येथे आली होती. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून नाव ऐकले आहे. साहजिकच चांगल्या सुविधा असतील अशी भावना होती. परंतु येथे आल्यानंतर येथील सुविधांचे विदारक चित्र दिसून आले. सर्वच पॉईंटची दुरवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधी व शासनाने विकासाबाबत लक्ष घातले पाहिजे.
-धनश्री पाटील, पर्यटक, खारघर (मुंबई)