म्हसावद ते सुलतानपूर रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST2021-02-05T08:07:23+5:302021-02-05T08:07:23+5:30
हा रस्ता मध्यप्रदेश राज्याकडे जाण्यासाठी एकमेव असल्याने परिसरातील नागरिकांसाठी सोयीचा ठरत आहे. या रस्त्याचे रूंदीकरण होणार असले तरी एक ...

म्हसावद ते सुलतानपूर रस्त्याची दुरवस्था
हा रस्ता मध्यप्रदेश राज्याकडे जाण्यासाठी एकमेव असल्याने परिसरातील नागरिकांसाठी सोयीचा ठरत आहे. या रस्त्याचे रूंदीकरण होणार असले तरी एक ते दीड वर्षापासून घोडे अडले कोठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य डाॅ. किशोर पाटील यांनी या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत खासदार डाॅ. हिना गावीत, आमदार राजेश पाडवी, जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडे अनेकवेळा तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे. रस्ता चार किलोमीटरचा असला तरी पार करण्यासाठी अर्ध्या तासाचा कालावधी लागतो, इतकी दुर्दशा या मार्गाची झाली आहे.
रस्त्यात मोठमोठे खड्डे झाल्याने ऊस, केळी व पपईची वाहने नेताना वाहन चालकाला जीव धोक्यात टाकून जावे लागते. दर १५ दिवसात एक वाहन पलटी होत असून, वाहन मालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. डांबरीकरण नावालाच उरले असून, खडी उखडून गेली आहे. रस्त्यावरील भराव अनेक ठिकाणी खचल्याने उंचवटे तयार झाले आहेत. चारही फरशींवरील भराव खचला असून, वळणावरील रस्त्यांच्या बाजूची झाडे वाढली आहेत. परिणामी समोरून येणारे वाहन दिसत नाही. हा रस्ता टवळाई, गणोर, अंबापूर, आडगाव व म्हसावद परिसरातील गावाना सोयीचा असून, वर्दळीचा रस्ता असल्याने रस्त्याची दुरूस्ती, रूंदीकरण त्वरित करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य डाॅ. किशोर पाटील यांच्यासह सुलवाडा, सुलतानपूरचे सरपंच, उपसरपंच व नागरिकांनी केली असून, दुरूस्ती न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.