पोलिसांच्या ‘मुस्कान’ने फुलविले अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे ‘हास्य’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 12:36 IST2020-12-22T12:36:37+5:302020-12-22T12:36:45+5:30
नंदुरबार : ‘मुस्कान’ने अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे. अनेक कुटुंबाच्या आनंदात आनंदाची पेरणी केली आहे. जिल्ह्यात ही मोहिम ३१ ...

पोलिसांच्या ‘मुस्कान’ने फुलविले अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे ‘हास्य’
नंदुरबार : ‘मुस्कान’ने अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे. अनेक कुटुंबाच्या आनंदात आनंदाची पेरणी केली आहे. जिल्ह्यात ही मोहिम ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. ‘मुस्कान’साठी नेमलेल्या पथकांनी तब्बल २४१ बालकांना कुटूंबाकडे किंवा बाल सुधारगृहात पाठिवले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकुण आठ मोहिमा राबविण्यात आल्या असून सद्या नववी मोहिम सुरू आहे. ही मोहिम ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. अनेक बालके वाईट मार्गाला लागण्यापासून या मोहिमेमुळे वाचली आहेत. सद्या परत आलेली मुले कुटूंबांत आनंदाने राहत आहे. जिल्हा पोलिसांनी केवळ मुस्कान मोहिमेतच नाही तर इतर वेळी देखील हरविलेली, बेपत्ता किंवा वाट चुकलेल्या मुलांना घरी पोहचवले आहे. या मोहिमेच्या यशात पोलीस दलाच्या सर्व घटकांचा सहभाग आहे.
भिक मागणारा बालक
विसरवाडी बसस्थानकात एक चार वर्षीय बालक भिक मागत असल्याची माहिती मुस्कानच्या पथकाला मिळाली. पथकातील सदस्यांनी या बालकाला जवळ घेतले. परंतु पोलीस पाहून तो घाबरला. त्याला विश्वासात घेऊन माहिती विचारली असता त्याने त्याचा पत्ता रा.पालेज, ता.राजानगर, जि.भरूच असे सांगितले. त्यामुळे पथकाने त्या भागात त्याचा शोध घेतला तेथे त्याचे पालक सापडले. त्यानंतर त्या बालकाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
दोन्ही बहिणी सुधारगृहात
नवापुरात दोन अल्पवयीन मुली भिक मागत फिरत असल्याचे पथकाच्या लक्षात आले. पथकाने क्षणाचाही विलंब न करता त्या बालिकांना शोधले. त्यातील एक १३ तर दुसरी पाच वर्षांची आहे. त्यांना पथकातील महिला कर्मचा-यांनी मायेने चौकशी केली असता त्यांनी आई पळून गेली तर वडिल मुंबई येथे काम करीत असल्याचे सांगितले. पत्ता मात्र सांगू शकल्या नाही. त्यामुळे या बालिकांना नंदुरबारातील बाल सुधारगृहात रवाना करण्यात आले.
प्रेम प्रकरणातील बालिका
नंदुरबार तालुक्यातील एका अल्पवयीन बालिकेस तिच्या प्रियकर पळवून घेऊन गेला होता. त्यांचा मोबाईलवरून त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले. मुलीची समजूत काढून तिला सर्व कायदेशीर बाबी समजवून सांगितल्या. त्यानंतर अल्पवयीन मुलीला आईच्या ताब्यात देण्यात आले. परंतु आईने ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे पथकापुढे पेच निर्माण झाला. पथकाने बालसुधारगृहात दाखल केेले.
मुस्कान मोहिमेअंतर्गत अनेक बालकांना त्यांच्या कुटूंबात पोहचविण्यात यश मिळाले. हरविलेले, घरून निघून गेलेली बालके जेंव्हा कुटूंबात पोहचतात तेंव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान पाहून काम आणि मेहनत केल्याचे सार्थ झाल्याचे वाटते. मोहिमेत २०११ च्या मिसिंगचीही उकल केली आहे. पोलीस अधीक्षक, अपर अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे या मोहिमा आणखी व्यापकपणे राबविण्याचे नियोजन आहे.
- विजयसिंह राजपूत, पोलीस निरिक्षक, स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखा.