नंदुरबारात रेल्वे रोकोला जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:21 IST2021-02-19T04:21:00+5:302021-02-19T04:21:00+5:30
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने दिल्ली संयुक्त किसान आंदोलनाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार,१८ रोजी देशव्यापी रेल्वे आंदोलन ...

नंदुरबारात रेल्वे रोकोला जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखले
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने दिल्ली संयुक्त किसान आंदोलनाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार,१८ रोजी देशव्यापी रेल्वे आंदोलन पुकारण्यात आले होते. सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेने नंदुरबार, नवापूर, खांडबारा या रेल्वे स्थानकांवर आंदोलनाची तयारी केली होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अगोदरच नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या बाहेर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावला होता.
सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे लीलाबाई वळवी, सेक्रेटरी विक्रम गावीत, संघटक करणसिंग कोकणी, उपाध्यक्ष जमना ठाकरे रेल्वे रोको आंदोलनासाठी दुपारी स्थानकावर दाखल झाले. पदाधिकारी व कार्यकर्ते रेल्वे रोको आंदोलनासाठी रेल्वे स्थानकात जात असताना त्यांना पोलिसांनी रेल्वे रोको आंदोलन करण्यास मज्जाव करीत प्रवेश नाकारला. यावेळी सेक्रेटरी कॉ. विक्रम गावीत व पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना अधिकाऱ्यांना आंदोलन करण्याची विनंती केली. परंतु पोलिसांनी स्थानकात जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे आंदोलकांना रेल्वे रोको आंदोलन करता आले नाही.
स्थानक प्रबंधकांना आंदोलकांचे निवेदन
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने दिल्ली संयुक्त किसान आंदोलनाकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनांच्या माध्यमातून देशव्यापी रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून नंदुरबार रेल्वे स्थानकावर सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्यावतीने रेल्वे रोको आंदोलनाची हाक देण्यात आली होती. परंतु,स्थानकात पोलिसांनी प्रवेश नाकारल्यामुळे परिसरात आंदोलकांनी निदर्शने करीत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानक प्रबंधकांना निवेदन दिले. निवेदनावर अध्यक्ष कॉ. लीलाबाई वळवी, सेक्रेटरी कॉ.विक्रम गावीत, संघटक कॉ.करणसिंग कोकणी,उपाध्यक्ष कॉ. जमना ठाकरे,कॉ. मनोहर वळवी,कॉ. फत्तेसिंग कोकणी, कॉ.बकराम वळवी, कॉ.बाबुराव ठाकरे,कॉ. वळवी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
बंदूकधारी पोलीस बंदोबस्त
२६ जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी शहर पोलीस ठाणे, रेल्वे मार्ग पोलीस स्टेशन व रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थानकात सकाळपासूनच बंदोबस्त लावला होता. बंदोबस्तात बंदूकधारी पोलीस कर्मचाऱ्यांच्या समावेश होता.