पोलीस दलाकडून लाॅकडाऊनमध्ये २८ हजार केसेस दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:21 IST2021-06-22T04:21:19+5:302021-06-22T04:21:19+5:30
नंदुरबार : ‘ब्रेक द चेन’अंतर्गत नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून बेशिस्त लोकांवर २८ हजार १६१ केसेस करण्यात आल्या आहेत. त्यातून ...

पोलीस दलाकडून लाॅकडाऊनमध्ये २८ हजार केसेस दाखल
नंदुरबार : ‘ब्रेक द चेन’अंतर्गत नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून बेशिस्त लोकांवर २८ हजार १६१ केसेस करण्यात आल्या आहेत. त्यातून ४२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलीस दलाकडून देण्यात आली आहे. पहिल्या लाॅकडाऊनमध्ये पोलिसांकडून अडीच हजार जणांवर केसेस करून २४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता.
जिल्हा पोलीस दलाकडून एक एप्रिलपासून सुरू झालेल्या लाॅकडाऊन काळात विविध कारवाया करण्यात आल्या आहेत. यातून सातत्याने बेशिस्त लोकांकडून दंड वसूल करून गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखून धरण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलीस दलाकडून विनामास्कच्या एकूण १३ हजार ६४१ केसेस करण्यात आल्या असून, त्यातून २७ लाख २८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्या आदेशांच्या उल्लंघनाच्या ५२८ केसेस करण्यात आल्या. यातून न्यायालयाने बेशिस्तांना ५२ हजार ५०० रुपयांचा दंड केला. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या एकूण ६६१ केसेस करण्यात आल्या. त्यातून १ लाख ३२ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, निर्धारित वेळेनंतर दुकाने सुरू ठेवत व्यवसाय करणाऱ्या १६७ आस्थापनांवर कारवाई करून १ लाख ११ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याबाबत ४० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील ६५ दुकाने ही सील करण्यात आली. मनाई असतानाही रस्त्यावर आलेल्या रिक्षा, टॅक्सी व बस यांच्यावर १२ हजार ६३ केसेस करण्यात आल्या आहेत. त्यातून १० लाख ९३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या ९०६ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख ८१ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. येत्या काळातही ही कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
विवाह सोहळ्याप्रकरणी तीन गुन्हे
या कारवाई अंतर्गत संचारबंदीत ७० केसेस करण्यात आल्या असून, परवानगी न घेता विवाह सोहळा घेत २५पेक्षा अधिक नातलगांच्या हजेरीमुळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात २० आरोपींविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
वसूल करण्यात आलेल्या ४२ लाख ९९ हजार ६०० रुपयांची रक्कम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात जमा करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.