कोणीतरी आम्हाला गावी पोहोचते करा हो़ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 12:45 IST2020-03-28T12:45:10+5:302020-03-28T12:45:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : शासनाने पाहिजे ती चाचणी घ्यावी, हवी ती तपासणी करावी, परंतु आम्हाला आमच्या गावापर्यंत पोहोचवण्याची ...

कोणीतरी आम्हाला गावी पोहोचते करा हो़ !
लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : शासनाने पाहिजे ती चाचणी घ्यावी, हवी ती तपासणी करावी, परंतु आम्हाला आमच्या गावापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करावी, आम्हाला फार अडचणींचा सामना करावा लागत आहे, अशी आर्त हाक देणारे परप्रांतीय मजूर सध्या धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर नजरेस पडत आहेत़ गुजरातमधील बारडोली, राजकोट येथे काम करणारे परप्रांतीय मजूर गुरुवारी पायपीट करत विसरवाडी ता़ नवापुर येथे आल्यानंतर त्यांनी त्यांची आपबिती सांगितली़
कोरोनामुळे देशभरात संचारबंदी लागू झाल्याने लागलीच सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली. बस, रेल्वेसह खाजगी वाहनेही बंद झाल्याने हजारोप परप्रांतीय मजूर गुजरात राज्यातील विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. हाताला कामही आणि डोक्यावर छतही नसल्याने त्यांनी गुजरात सोडण्याचा निर्णय घेत गावाकडे धाव घेतली आहे़ अत्यंक बिकट अवस्थेत सापडलेले काही युवक सध्या पायपीट करत छत्तीसगढकडे आपआपल्या गावाकडे निघाले आहेत़ गुजरातमधील बारडोली व राजकोट येथून ते मार्गस्थ झाले आहेत़
गेल्या चार दिवसांपासून निघालेले हे मजूर गुरुवारी रात्री विसरवाडी येथे पोहोचले होते़ कोणतेही वाहन नसल्याने पायी चालत ते गावाकडे निघाले आहेत़ रस्त्यात एखादे वाहन भेटल्यावर मग आर्जव-विनंत्या करुन ते वाहन जाईल तेथवर मजूर पोहोचत आहेत़ तेथून पुन्हा पायपीट करत निघायचे असा मार्ग त्यांनी धरला आहे़ भूक लागल्यावर रस्त्यात सर्व हॉटेल वगैरेही बंद असल्याने उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. दोन दिवसांपासून उपाशीच असल्याचे राजकोट येथे कामास असलेले व छत्तीसगड येथील रहिवासी रवी कौशिक व सुंदरकुमार कौशिक यांनी ‘लोकमत'शी बोलताना सांगितले.
राजू बोरकर हे बारडोली येथे मिस्त्री काम करतात व सध्याच्या परिस्थितीत हाताला काम नसल्याने नागपूरला त्यांच्या गावी ते निघाले आहे. रस्त्यात गुजरात पोलिसांनी हाकलून लावले. काही ठिकाणी मारही खावा लागला, असा प्रवास करत महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत आलो. मात्र महाराष्ट्र पोलिसांनी आमच्या व्यथा जाणून घेतल्या व आम्हाला मदत केली असे ते म्हणाले. तसेच नवापूरकडून दहिवेलपर्यंत जाणाऱ्या एका ट्रक चालकास विनंती केल्यावर त्यांना दहिवेलपर्यंत बसवण्यात आले.
दरम्यान शुक्रवारीही काही मजूरांचे जत्थे विसरवाडीपर्यंत पायपीट करत आले होते़ यातील काही मजूर हे धुळे तर काही नंदुरबार जिल्ह्यातील होते़ येथून ते पायी आपल्या गावाकडे निघाले आहेत़