लोकहो... कोरोना वाढू द्यायचा की रोखायचा तुम्हीच ठरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST2021-03-25T04:28:18+5:302021-03-25T04:28:18+5:30

मनोज शेलार जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. मृत्यूंचे प्रमाणदेखील वाढले आहे. विशेष म्हणजे मृत्यू होणाऱ्यांमधील वयोगट बदलला आहे. सरासरी ...

People ... you decide whether to let the corona grow or stop it | लोकहो... कोरोना वाढू द्यायचा की रोखायचा तुम्हीच ठरवा

लोकहो... कोरोना वाढू द्यायचा की रोखायचा तुम्हीच ठरवा

मनोज शेलार

जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. मृत्यूंचे प्रमाणदेखील वाढले आहे. विशेष म्हणजे मृत्यू होणाऱ्यांमधील वयोगट बदलला आहे. सरासरी ४५ ते ७० या वयोगटातील व्यक्तिंचा त्यात समावेश आहे. पहिल्या टप्प्यात लहान मुलं कोरोनापासून लांब होती, परंतु गेल्या काही दिवसात आढळलेल्या रुग्णांमध्ये ६ ते १८ वयोगटातीलही मुलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नंदुरबार आणि शहादा शहरातील एकही भाग यातून सुटलेला नाही की जेथे कोरोना रुग्ण नाही. सर्वच शहर कोरोनाने कवेत घेतल्याचे चित्र आहे. या सर्व बाबी पाहता कोरोनाची ही दुसरी लाट आणखी वाढू न देण्यासाठी सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक आहे. सरकारी नियमांचे, कायद्यांचे आणि प्रतिबंधांचे पालन करणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात कोरोनाची पहिली लाट बऱ्यापैकी थोपवून धरण्यात शासन, प्रशासनाला यश आले होते. मार्च ते मे दरम्यान अगदीच तुरळक कोरोना रुग्ण जिल्ह्यात आढळून येत होते. त्यामुळे नंदुरबार पॅटर्नचा चांगलाच गवगवा झाला होता. नंतर मात्र जिल्ह्यातही कोरोनाने शिरकाव केला. शहरी भागासह थेट दुर्गम भागातील धडगाव, तोरणमाळ, मोलगीसारख्या भागात रुग्ण आढळले होते. दसरा, दिवाळीपासून २०२१सुरू होण्यापर्यंत अर्थात तीन ते चार महिने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. नंतर अर्थात फेब्रुवारी महिन्यापासून त्यात पुन्हा वाढ झाली आहे. सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळत आहेत. आतापर्यंतचा सर्वाधिक रुग्णांचा उच्चांक हा मंगळवार, २४ मार्च रोजी झाला. तब्बल ६२६ रुग्ण एकाच दिवसात आढळले. याशिवाय चारपेक्षा अधिक जणांचा एकाच दिवशी मृत्यू होण्याचे प्रकारदेखील गेल्या चार दिवसात वाढले आहेत. चार दिवसात सतत चारपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. चार दिवसात १९ जणांचा मृत्यू होणे, ही बाब काळजीत टाकणारी आहे. मृत्यू होणाऱ्यांचा वयोगट देखील कमी कमी होत चालला आहे. पहिल्या टप्प्यात एकूण मृत्यूंपैकी ८० टक्के मृत्यू हे ६० वर्ष वयापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तिंचे झाले होते. परंतु, आता अर्थात गेल्या महिनाभरात सरासरी ४५ ते ६५ वर्ष वयाच्या व्यक्तिंचा मृत्यू होणाऱ्यांमध्ये सर्वाधिक समावेश आहे. महिनाभरातील मृत्यूंच्या सरासरी टक्केवारीत या वयोगटातील व्यक्तिंची टक्केवारी ही जवळपास निम्मी आहे.

दुसरीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेड मिळत नसल्याची स्थिती आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना थेट सुरत किंवा नाशिकचा रस्ता धरावा लागत आहे. दीडशे ते २०० किलोमीटर अंतरावरील या शहरांमध्ये जाण्यासाठी आवश्यक सुविधा असलेल्या रुग्णवाहिकादेखील मिळणे जिकरीचे होत आहे. मंगळवारी तर विनवण्या करूनही शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होऊ शकले नाहीत. तब्बल ५०पेक्षा अधिक रुग्णांना सुरतला जावे लागल्याचे चित्र होते. यावरूनच कोरोनाच्या भयानक परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो.

प्रशासनाने संपर्क साखळी तोडण्यासाठी काही उपाययोजना राबविल्या आहेत. त्यांना जनतेने साथ देेणेही आवश्यक आहे. परंतु, तसे होताना दिसत नाही. सायंकाळी सातनंतर संचारबंदी असली, तरी रस्त्यावर फिरणाऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. बाजारात सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर सक्तीने करण्याचे आवाहन करण्यात येऊनही नागरिकांकडून त्याचे पालन होत नाही. सध्या प्रशासन सक्तीने या उपाययोजना राबवत नाही. जर सक्ती केली आणि कारवाईचा बडगा उगारला तर सर्वांनाच ते गैरसोयीचे ठरेल. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या उपाययोजना आणि लवकरच सुरू होणारा शनिवार व रविवारच्या जनता कर्फ्यूला सर्वांनी प्रतिसाद देणे आवश्यक आहे. प्रशासनावर काठी उगारण्याची आणि कारवाईची वेळ येऊ देऊ नका. कोरोनाला जिल्ह्यात वाढू द्यायचे की रोखायचे, हे जिल्हावासियांच्या हातात आहे. त्यामुळे आपल्या वागणुकीवर सर्वकाही अवलंबून असून, काळजी घ्या आणि कोरोनाला दूर ठेवा एवढेच आपल्या हाती आहे.

Web Title: People ... you decide whether to let the corona grow or stop it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.