लोक हो, घाबरू नका, योग्य सल्ला घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:29 IST2021-04-10T04:29:59+5:302021-04-10T04:29:59+5:30
नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. सद्यस्थितीत उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्याही १० हजारांवर गेली आहे. त्यामुळे सर्वच ...

लोक हो, घाबरू नका, योग्य सल्ला घ्या!
नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. सद्यस्थितीत उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्याही १० हजारांवर गेली आहे. त्यामुळे सर्वच रुग्णालये हाऊसफुल्ल आहेत. जिल्ह्यातून सुरत, नाशिक, बडोदा, पुणे, मुंबई येथे देखील उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. प्राप्त माहितीनुसार सुरत येथे जिल्ह्यातील जवळपास ५०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकीकडे ही परिस्थिती असताना रोज नव्याने ८०० ते १००० रुग्ण पाॅझिटिव्ह येत आहेत. गुरुवारी तर वर्षभरातील विक्रम झाला. सुमारे साडेअकराशे नवीन रुग्ण एकाच दिवसात आढळून आले. त्यामुळे आता कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. पाॅझिटिव्हीटी दर हा ३५ टक्क्यांपेक्षा अधिक गेला आहे.
एकीकडे रुग्ण वाढत असताना जिल्ह्यात आरोग्य सेवेला मर्यादा आहेत. तज्ज्ञ डाॅक्टरांची कमतरता, मोठ्या रुग्णालयाचा अभाव, आधुनिक सामुग्रीचा अभाव अशा अनेक अडचणी आहेतच. त्यातच सर्व रुग्ण तज्ज्ञांपर्यंत पोहोचत नाहीत. प्रत्येकास उपचारासंदर्भात योग्य सल्ला मिळत नसल्याने अगदी साधा ताप, सर्दी झाली की, प्रत्येक रुग्ण तपासणी करण्यापूर्वीच सिटीस्कॅन करण्यासाठी पोहोचतो. काही जण ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे ते बाहेरच्या मोठ्या रुग्णालयात ॲडमीट होतात. आवश्यक नाहीत त्या चाचण्या व उपाय सुरू झाल्याने सर्वत्र गोंधळलेले व भीतीचे वातावरण दिसून येत आहे. अशा स्थितीत तज्ज्ञांचे सल्ले महत्त्वाचे आहेत.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरच सिटीस्कॅन करा
कोरोनामुळे उपचारासाठी नागरिक तज्ज्ञांचा सल्ला न घेता सिटीस्कॅन करीत आहेत. वास्तविक लक्षणे सुरू झाल्यानंतर साधारणत: चार ते पाच दिवसांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आवश्यकता भासल्यास सिटीस्कॅन करणे आवश्यक आहे. सध्या अनेक रुग्ण तपासणी करण्यापूर्वी सिटीस्कॅन करीत आहेत आणि सिटीस्कॅननंतर अनेक रुग्णांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह येत आहे. तरुण मंडळींसाठी सिटीस्कॅनची फारशी आवश्यकता नाही. मात्र, त्यांचीही गर्दी सुरू आहे. रुग्णांनी याबाबत शांतपणे विचार करण्याची गरज आहे. लक्षणे दिसल्यास आधी तपासणी करा. रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला तरच तज्ज्ञ डाॅक्टरांकडून तपासणी करून घ्या. त्यांच्या सल्ल्यानंतर आवश्यकता भासल्यास पुढील चाचण्या करा, अन्यथा घरी थांबूनही आजारावर मात करता येते. खूप घाबरण्यासारखे वातावरण नाही.
- डाॅ.राजेश वळवी, छातीरोगतज्ज्ञ, नंदुरबार
रेमडिसीवरसाठी धावपळ करू नका
सर्वच रुग्णांना रेमडिसीवर इंजेक्शनची गरज नाही. हे इंजेक्शन म्हणजे कोरोना रुग्णांसाठी संजीवनी आहे असा जो लोकांमध्ये भ्रम झाला आहे तो आधी सर्वांनी बाहेर काढावा. या इंजेक्शनचे जेवढे फायदे आहेत तेवढे आवश्यकता नसल्यास घेतल्यास तोटेही आहेत. ज्या रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल ९५ पेक्षा कमी जात असेल अशा रुग्णांनी फक्त तज्ज्ञ डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावे. पण, सध्या सिटीस्कॅनचा स्कोर काहीही आला तरी सर्व जण रेमडिसीवर इंजेक्शनची मागणी करीत आहेत. त्यामुळे या इंजेक्शनची चर्चा सुरू झाली आणि टंचाई भासत आहे. मध्यंतरी या इंजेक्शनची मागणी घटल्याने उत्पादक कंपन्यांनीही उत्पादन कमी केले होते. आता रुग्ण वाढत असल्याने उत्पादन सुरू झाले आहे. इंजेक्शनचे उत्पादन झाल्यानंतरही त्याला इतर चाचण्यांसाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे येत्या १५ एप्रिलनंतर साधारणत: हे इंजेक्शन मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत येईल. वास्तविक सध्यादेखील या इंजेक्शनचा तुटवडा नाही. त्यामुळे अनावश्यक होणारा या इंजेक्शनचा वापर टाळला पाहिजे.
- डाॅ.राजेंद्र भारुड, जिल्हाधिकारी, नंदुरबार
प्रशासनाच्या सुविधा
जिल्ह्यात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी शासकीय व खासगी मिळून एक हजार बेडची व्यवस्था
६७ व्हेंटीलेटर बेडची सुविधा
जिल्हा रुग्णालयात २२० ऑक्सिजन बेडची व्यवस्था
स्वॅब तपासणीसाठी स्वतंत्र आधुनिक लॅब
रोज जवळपास १८०० ते २००० जणांची स्वॅब तपासणी
जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट, रोज २५० ऑक्सिजन सिलिंडर निर्मिती
जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती
n आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या- २५,७६७
n बरे झालेले रुग्ण- १६,०३६
उपचार घेत असलेले रुग्ण- १०,५२०
एकूण मृत्यू- ३९७
जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन बेडवरील रुग्णसंख्या- १४७
व्हेंटीलेटरवरील रुग्ण- १०