पीक विमा काढण्याकडे शेतकरी वर्गाने फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:20 IST2021-07-08T04:20:50+5:302021-07-08T04:20:50+5:30

ब्राह्मणपुरी : गेल्या खरीप हंगामात पिकांचे संरक्षण करण्यासाठी तालुक्यातील हजारावर शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता. यातील काही मोजक्याच शेतकऱ्यांना ...

The peasantry turned its back on crop insurance | पीक विमा काढण्याकडे शेतकरी वर्गाने फिरवली पाठ

पीक विमा काढण्याकडे शेतकरी वर्गाने फिरवली पाठ

ब्राह्मणपुरी : गेल्या खरीप हंगामात पिकांचे संरक्षण करण्यासाठी तालुक्यातील हजारावर शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता. यातील काही मोजक्याच शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजनेची मदत मिळाली. तर उर्वरित शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले. यामुळे यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी विमा उतरवण्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यात गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. गेल्या खरीप हंगामात परतीच्या अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामुळे पिकांना फटका बसला.

सोयाबीन, कापूस या प्रमुख पिकांचे अतोनात नुकसान झाले. तर शेतकऱ्यांच्या घरात येईल, अशी अपेक्षा असताना पुन्हा पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला. त्यामुळे पंतप्रधान पीकविमा योजनेचे कवच असल्याने शेतकऱ्यांना विमा मिळण्याची अपेक्षा होती.

त्यातून काही प्रमाणात का होईना, यावर्षीच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना थोडा आधार मिळाला असता, मात्र या ठिकाणीही शेतकऱ्यांची निराशा झाली. शेतकऱ्यांच्या तोंडाला विमा कंपन्यांनी पाने पुसण्याचे काम केले. विमा कंपन्यांनी ऐनवेळी शेतकरी वर्गाला काही अटी व नियम लावत वगळले व स्वतःचा कोटींचा लाभ करून घेतला. त्यामुळे यंदा शेतकरी वर्गाने पीकविमा उतरवण्याकडे पाठ फिरवली असल्याचे यावर्षी विमा न काढण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येवरून दिसून येते.

विमा लाभापासून शेकडो शेतकरी वंचित

गतवर्षी शेतकऱ्यांनी पिकाचा काढण्यात आलेल्या विमा रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी याकडे पाठ फिरविल्याचे शेतकरी बोलत आहेत. तर गत वर्षाचे शेकडो जण वंचित आहेत.

पीक कापणीच्या प्रयोगाच्या उत्पन्नाच्या आकडेवारीनुसार भरपाई

संबंधित पीक विमा कंपनीला विचारणा केली असता त्यांच्याकडून पीक कापणी प्रयोगाच्या उत्पन्नाच्या आकडेवारीनुसार आपल्या महसूल मंडळाला पीक विमा लागू झालेला नाही असे उत्तर देण्यात येत असते. जर पीक कापणीच्या प्रयोगाच्या उत्पन्नाच्या आकडेवारीनुसार मंडळाच्या पीक विमा लागू होत नसेल तर पैसे उकडण्यासाठी पीक विमा काढायला लावता का? असा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून होत आहे.

Web Title: The peasantry turned its back on crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.