रूग्णांचा पाॅझिटीव्हीटी दर ३७ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:31 IST2021-04-04T04:31:37+5:302021-04-04T04:31:37+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक प्रचंड संख्येने वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. रुग्णसंख्या वाढल्याने जवळपास ...

रूग्णांचा पाॅझिटीव्हीटी दर ३७ टक्क्यांवर
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक प्रचंड संख्येने वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. रुग्णसंख्या वाढल्याने जवळपास सर्वच रुग्णालये फुल्ल असून, बेड मिळविण्यासाठी वेटींग सुरू आहे. सीटीस्कॅनसाठीही रांगा लागत असल्याने आता कोरोना रूग्णाला तत्काळ उपचाराऐवजी प्राथमिक तपासणीच्या असह्य वेदनेला सामोरे जावे लागत आहे. पाॅझिटिव्हीटी दरही वाढला असून, तपासणी होणाऱ्या नागरिकांमध्ये जवळपास ३७ टक्क्यांपेक्षा अधिक तपासण्या पाॅझिटिव्ह येत आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात वर्षभरात कधी नव्हे, एवढी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. कोराेनाचा पहिला रुग्ण जिल्ह्यात १७ एप्रिलला आढळून आला होता. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय व नियम चांगल्या पद्धतीने पाळण्यात आल्याने फेब्रुवारी २०२१ पर्यंत जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात होता. १० मार्चनंतर मात्र कोरोनाचा विस्फाेट झाल्यागत स्थिती आहे. दररोज ५०० पेक्षा अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत. आता ही संख्या ८०० वर गेली आहे. चिंतेची बाब म्हणजे, तपासणी करणाऱ्या नागरिकांमध्ये जवळपास ३७ टक्क्यांपेक्षा अधिक जण पाॅझिटिव्ह येत आहेत. मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याने आता सर्वांनाच चिंता लागून राहिली आहे.
१४ दिवसांत सात हजार रुग्ण
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या १४ दिवसांत अर्थात २० मार्चपासून आतापर्यंत सुमारे सात हजारपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. अर्थात ही शासकीय तपासणीची आकडेवारी आहे. खासगी चाचणी व केवळ सीटीस्कॅन करून उपचार करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. शासकीय तपासणीतील आकडेवारी पाहिल्यास २० मार्च ते २ एप्रिलपर्यंत एकूण १८ हजार २५१ जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी सहा हजार ८५८ रुग्ण पाॅझिटिव्ह आले आहेत. अर्थातच ३७ टक्क्यांपेक्षा अधिक पाॅझिटिव्हीटी दर आहे. या १४ दिवसांत काही दिवशी हा दर ५० टक्क्यांपर्यंत गेला होता.
मृत्यूचे प्रमाणही वाढले
जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही सुरुवातीपेक्षा अधिक वाढले आहे. गेल्या वर्षभरात अर्थात २० मार्चपर्यंत एकूण २५३ जणांचा मृत्यू नोंदविला होता. त्यानंतर गेल्या १४ दिवसांत मात्र ही संख्या ३४६ झाली आहे. रोज तीन ते सात जणांचा मृत्यू होत आहे. शुक्रवारीदेखील दिवसभरात सात जणांचा मृत्यू झाला. अर्थात ही शासकीय आकडेवारी असली तरी पालिकेकडील नोंदीनुसार हीच मृत्यूची संख्या ३८० पेक्षा अधिक आहे. याशिवाय निदान होण्यापूर्वीच मृत झाल्यांचा आकडा वेगळा आहे.
निदान पूर्वीच्या रुग्णांच्या यातना
उपचारासाठी सुरू असलेल्या यातनाइतक्याच किंबहुना त्यापेक्षा जास्त यातना रुग्णांना उपचारापूर्वी सोसाव्या लागत आहेत. मुळातच रुग्णाला त्रास झाल्यानंतर स्वॅब देण्यासाठी रांगेत उभे राहणे, स्वॅब दिल्यानंतर त्याचा अहवाल काहींना एक ते दोन दिवसांत मिळतो काहींना तर पाच ते आठ दिवसांपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. या प्रतीक्षेनंतर सीटीस्कॅनसाठी जवळजवळ प्रत्येक सेंटरवर रोज २०० पेक्षा अधिक नंबर असतात. काहींनी तर रुग्णालयासमोर मंडप टाकला आहे. या सीटीस्कॅनसाठी दिवसभराची उन्हात वेटींग, त्याचा अहवालासाठी वेटिंग आणि अहवाल आल्यानंतर बेडसाठी वेटिंग अशा गंभीर अवस्थेतून रुग्णांना जावे लागत असल्याने परिस्थिती अधिकच बिकट होत आहे.
कुणी बेड? देता का बेड?
रुग्णांची संख्या प्रचंड वाढत असल्याने नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील सर्वच रुग्णालये हाऊसफुल्ल आहेत. त्यामुळे बेड मिळविण्यासाठी अक्षरश: रुग्णालयांमध्ये वेटिंग असल्याचे चित्र आहे. काही रुग्णालयात बाकांवरच रुग्णांना झोपवून उपचार केले जात आहेत. रुग्णालय प्रशासनाकडे सातत्याने रुग्णांची बेडची विचारणा सुरू आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची आज ‘कुणी बेड देता का बेड? ’ ही एकच मागणी दिसून येत आहे.