शैक्षणिक इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट पासच्या निर्णयाबाबत पालकांच्या प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:27 IST2021-04-05T04:27:19+5:302021-04-05T04:27:19+5:30
निर्णयाबाबत पालकांच्या संमिश्र प्रतिक्रिया परीक्षा न घेण्याचा निर्णय योग्यच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शिक्षण एक प्रकारे बंदच होते. अधून मधून ...

शैक्षणिक इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट पासच्या निर्णयाबाबत पालकांच्या प्रतिक्रिया
निर्णयाबाबत पालकांच्या संमिश्र प्रतिक्रिया
परीक्षा न घेण्याचा निर्णय योग्यच
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शिक्षण एक प्रकारे बंदच होते. अधून मधून शिक्षक येऊन गृहपाठ देऊन शिक्षण सुरू ठेवले. अशात परीक्षा जरी झाल्या असत्या तरी विद्यार्थ्यांना पासच केले असते. आता फक्त त्याची अधिकृत घोषण झाल्यासारखे झाले. कोरोनामुळे परीक्षा घेणं शक्यच नाही. ग्रामीण व दुर्गम भाग असूनदेखील आता मुलांची काळजी वाटते. परीक्षा न घेण्याचा निर्णय चांगला आहे. -रमेश पाडवी, पालक, कोठार
पाल्यांना परीक्षेला पाठविले नसते...
सध्या सर्व क्षेत्रांची परिस्थिती बिकट झाली आहेत, शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद ठरले नसून आज कोरानाची वाढते रुग्णसंख्या बघता परीक्षा घेणे शक्य नाही. जरी सरकारने परीक्षा घेतली असती तरी आम्ही आमच्या पाल्यांना शाळेत परीक्षेला पाठविले नसते. दरवर्षीदेखील परीक्षा घेऊन मुलांना नापास तर केले जात नाही, फक्त परीक्षा व निकालाचे सोयरसुतक राहणार नाही.
-भूषण पवार, पालक, तळोदा
किमान परीक्षेची तयारी पाहीजे होती...
आजच्या स्थितीला जरी शासनाचे निर्णय योग्य वाटत असला तरी संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने यासंबंधी तयारी करायला पाहिजे होती. परीक्षेसाठी विशिष्ट प्रकारच्या बाबींची व्यवस्था करणे गरजेचे होते, जेणेकरून विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासाचे मूल्यमापन करता येणे शक्य झाले असते व विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात परीक्षा देऊन पास झाल्याचे समाधान राहिले असते.
-अमर पाटील, पालक, तळोदा
परीक्षेमुळे शिक्षणाप्रती जाणीव झाली असती...
शासनाचा यावर्षी परीक्षाच न घेण्याचा निर्णय आश्चर्यकारक वाटला, कारण ऑनलाइनच्या युगात उपलब्ध कोणत्या ना कोणत्या मार्गाने परीक्षा औपचारिकता म्हणून का होईना घेणे आवश्यक होते. त्याद्वारे शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्याचे विद्यार्थी व पालक यांना समजले असते. परीक्षा दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाप्रती जाणीव निर्माण झाली असती.
-अल्ताफ पिंजारी, पालक, तळोदा
शैक्षणिक दृष्टीने निर्णय चिंताजनक आहे
प्रत्यक्ष शाळेत शिकविणे व ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेणे यात मोठी तफावत आहे. नेटवर्क प्रॉब्लेम व सातत्याने मोबाइलचा वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. मोकळेपणाने शिक्षण घेता आले नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून शासनाने सलग दुसऱ्या वर्षी परीक्षा रद्द केल्यामुळे शासनाची ही भूमिका चांगली असली, तरी शैक्षणिक दृष्टीने चिंताजनक आहे
-सोनाली लोकरे, गृहिणी, शहादा
शैक्षणिक विकासासाठी विविध उपाययोजना राबविल्या पाहिजे
कोरोनामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत शिक्षण घेता आले नाही, त्यांनी ऑनलाइन शिक्षण घेतले ते तोकडेच होते. त्यात परीक्षा न होणे यामुळे मुले अभ्यास करणार नाही आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. बालकांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने त्यांची परीक्षा घेण्याऐवजी त्यांना सरसकट पास केले असले, तरी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी वेगळ्या उपायोजना राबविल्या पाहिजे.
-अमिता अशोक आहिरे, गृहिणी, शहादा