चार पोल्ट्रीमधील ५१ हजार पक्षी नष्ट करण्याचे आदेश, व्यावसायिकांचा आत्महत्येचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:59 IST2021-02-18T04:59:36+5:302021-02-18T04:59:36+5:30
नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना पोल्ट्री व्यावसायिकांनी निवेदन दिले. चार पोल्ट्री फार्ममध्ये मरतूक नसताना किलिंग ऑपरेशन करू नये. आधी ...

चार पोल्ट्रीमधील ५१ हजार पक्षी नष्ट करण्याचे आदेश, व्यावसायिकांचा आत्महत्येचा इशारा
नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना पोल्ट्री व्यावसायिकांनी निवेदन दिले. चार पोल्ट्री फार्ममध्ये मरतूक नसताना किलिंग ऑपरेशन करू नये. आधी एक किलोमीटर परिसरातील पक्षी नष्ट करण्याचे मार्गदर्शन असताना अचानक अडीच किलोमीटर अंतरावरील पोल्ट्रीतील पक्षी नष्ट करण्यात येणार असल्याने चारही पोल्ट्री व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. जर आमच्या पोल्ट्रीतील कुकुट पक्ष्यांची मरतूक नाही, दोन निगेटिव्ह अहवाल असताना पोल्ट्रीतील पक्षी व अंडी पशुखाद्य नष्ट करणार असणार तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही असे व्यावसायिकांनी म्हटले आहे. पशुसंवर्धन विभागाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता नवापूर २२ पोल्ट्रीत बर्ड फ्लूची लागण झाली आहे. त्यावर केंद्र सरकारने जिल्हा प्रशासनाला बर्ड बाधित क्षेत्र एक किलोमीटरऐवजी अडीच किलोमीटर घेऊन कारवाई करावी, असे आदेश प्राप्त झाल्याने नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी नवापूर पोल्ट्रीत व्यवसायिकांना आदेश दिले आहे. चारही पोल्ट्रीतील दोन अहवाल निगेटिव्ह आहेत तिसरा अहवाल आज पाठवण्यात आला आहे गुरुवारी रिपोर्ट येईल, असे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. त्यानुसार नंदुरबार जिल्हा प्रशासनाने कारवाईची नियोजन केले आहे. नवापूर शहरातील राज्यातील सर्वात मोठे किलिंग ऑपरेशन आठवडाभरापासून राबविण्यात आले आहे. या २४ पोल्ट्रीमध्ये लाखो पक्षी व अंडी नष्ट करण्यात आले. यासाठी नाशिक विभागातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर येथील पशुसंवर्धन विभागातील ९५ पथकामार्फत किलिंग ऑपरेशन राबविण्यात आले. साधारणत: साडेचारशे ते पाचशे विभागातील कर्मचारी गेल्या आठवडाभरापासून नवापूरमध्ये मुक्कामी होते. पेरानीयार पोल्ट्री २८ हजार कोंबड्या, पॅराडाईज ४ हजार ६०० कोंबड्या, रीची ६ हजार ५०० कोंबड्या, अशरफ पोल्ट्रीत १२ हजार कोंबड्या या चार पोल्ट्रीमधील एकूण ५१ हजार १०० कोंबड्या व अंडी व नष्ट करण्याची प्रक्रिया राबवण्यासाठी नवापूर तहसील कार्यालयात पोल्ट्री व्यावसायिकाची बैठक घेण्यात आली.
यात एक किलोमीटरऐवजी अडीच किलोमीटर अंतर निश्चित केल्याने चार पोल्ट्रीमधील कोंबड्या नष्ट करण्यात येणार असल्याने व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. दोन वेळा कुकुट पक्ष्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. तिसरा अहवाल बाकी आहे. अहवाल निगेटिव्ह असताना कोंबड्या नष्ट करण्याचा अट्टहास का करण्यात येत आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला. आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, अशी व्यथा व्यावसायिकांनी अधिकाऱ्यांसमोर मांडली.
मी साधारण कर्जबाजारी पोल्ट्री व्यावसायिक आहे. माझी आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. माझा पूर्ण घराचा उदरनिर्वाह पोल्ट्रीवर चालतो. पोल्ट्रीत मरतूक नाही. दोन अहवाल निगेटिव्ह असताना देखील जिल्हा प्रशासन गुरुवारपासून सिलिंग ऑपरेशन करत आहे एक किलोमीटरचा अंतर असताना अडीच किलोमीटर अंतर निश्चित केल्याने माझा पोल्ट्रीतील सर्व पक्षी नष्ट करण्यात येणार असल्याचे पत्र तहसीलदार यांनी दिल्याने मोठा धक्का बसला आहे. आमचे पक्षी वाचण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सहकार्य करावे.
-अशरफ टिमोल, संचालक,पोल्ट्री व्यवसायिक,नवापूर.
नवापूर परिसरातील २२ पोल्ट्रीतील किलिंग ऑपरेशन झाल्यानंतर थांबवलेले किलिंग ऑपरेशन अचानक सुरू केले. व्यावसायिकांना एक दिवसाची देखील मुदत दिली नाही. दुपारी तीन वाजता पत्र दिले आणि सकाळी किलिंग ऑपरेशन करण्यात येणार असल्याने व्यावसायिकांना न्यायालयात जाण्यासाठीसुद्धा संधी दिली नाही. साधारणत आम्हाला चार-पाच दिवस न्यायालयात जाण्यासाठी संधी द्यावी.
-सलाम बलेसरिया,संचालक, पोल्ट्री, व्यावसायिक,नवापूर
दोन अहवाल निगेटिव्ह आहे तिसरा अहवाल पॉझिटिव्ह आला तर कुकुट पक्षी नष्ट करावे, दोन अहवाल निगेटिव्ह आणि पक्षीची मरतूक नसताना किलिंग ऑपरेशन करण्यास जिल्हा प्रशासन अट्टहास का करीत आहे. आम्हाला कोर्टात जाण्याची संधी द्यावी.
-गुलाम व्होरा, संचालक, व्होरा पोल्ट्री,नवापूर.
ज्या पोल्ट्री फार्ममध्ये पक्ष्यांची मरतूक नाही अशा पोल्ट्रीतील पक्षी नष्ट करू नये असे कोर्टाचे आदेश असताना देखील नंदुरबार जिल्हा प्रशासन आमच्या पोल्ट्रीतील अहवाल निगेटिव्ह असताना कुठल्या प्रकारची मृत्यू नसतानादेखील उद्यापासून किलिंग ऑपरेशन सुरू करत आहे. आम्हाला कोर्टात जाण्याची मुदत जिल्हा प्रशासनाने द्यावी आमचे मोठे नुकसान होत आहे.
- अतिक बलेसरीया, पोल्ट्री व्यावसायिक,नवापूर.
माझ्या रिची पोल्ट्री फार्ममध्ये कुठल्याही प्रकारची मरतूक व दोन रिपोर्ट निगेटिव्ह असताना देखील जिल्हा प्रशासन गुरुवारपासून कुकुट पक्षी नष्ट करणार आहे. कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी २० लाख रूपयांचे बँकेतून कर्ज काढले आहे. २००६ मधील बर्ड फ्लूच्या उद्रेकमध्ये घरदार विकावे लागेल होते. माझे मोठे नुकसान आहे मी साधारण शेतकरी आहे.
-रिची शाह, संचालक,रिची पोल्ट्री फार्म,नवापूर.
ज्या पोल्ट्री फार्ममधील अहवाल निगेटिव्ह आहे. अशा पोल्ट्रीतील पक्षी नष्ट करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहे. या आदेशाचा अभ्यास करून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच पुढील ५१ हजार कुक्कुट पक्षी नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये पोल्ट्री व्यवसायिकांना कुक्कुट पक्षी नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तूर्त त्या आदेशाचा अभ्यास करून पुढील निर्णय घेण्यात येईल.
-मंदार कुलकर्णी, तहसीलदार, नवापूर.