एक हजार स्थलांतरीत मजूर परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 14:40 IST2020-04-29T14:39:12+5:302020-04-29T14:40:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे गुजरातमध्ये अडकून पडलेले सुमारे एक हजारापेक्षा अधिक मजूर मंगळवारी अचानक महाराष्टÑाच्या सीमेवर येऊन ...

एक हजार स्थलांतरीत मजूर परतले
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊनमुळे गुजरातमध्ये अडकून पडलेले सुमारे एक हजारापेक्षा अधिक मजूर मंगळवारी अचानक महाराष्टÑाच्या सीमेवर येऊन धडकल्याने प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. या मजुरांना महाराष्टÑात प्रवेश द्यावा की नाही याबाबत महाराष्टÑ आणि गुजरात या दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांमध्ये चार तास खल चालल्यानंतर सरकारच्या आदेशान्वये अखेर मजुरांना जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश मिळाला. दरम्यान, या सर्व मजुरांची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातून दरवर्षी २५ हजारापेक्षा अधिक मजूर गुजरातमध्ये रोजगारासाठी हंगामी स्थलांतरीत होतात. हे मजूर साधारणत: सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात जातात व मार्चनंतर टप्प्याटप्प्याने आपल्या गावी परततात. यावर्षी कोरोनामुळे देशात लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवल्याने हे मजूर गुजरातमध्येच अडकले आहेत. तेथेच त्यांचा पाडाव्याच्या ठिकाणी गुजरात प्रशासन व सेवाभावी संस्थांतर्फे त्यांना सुविधा पुरविल्या जात होत्या. मात्र लॉकडाऊन वाढल्याने सुविधांचा वाणवा सुरू झाला. मजुरांना तेथे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्याबाबतचे व्हीडीओ हे मजूर सोशल मिडियाद्वारे सातत्याने या भागातील कार्यकर्त्यांना पाठवत होते. त्यावर महाराष्टÑ शासनाने देखील गंभीरपणे विचार सुरू केला होता. गुजरातच्या सरकारने या मजुरांना महाराष्टÑाने घेऊन जावे, असा निर्णय यापूर्वीच जाहीर केला होता. पण महाराष्टÑात आणल्यानंतर या मजुरांना क्वारंटाईन कसे करावे, इतक्या मजुरांची सुविधा कशी करावी असे अनेक प्रश्न प्रशासनाला सतावत होते. या प्रश्नांवर तोडगा निघण्यापूर्वीच मंगळवारी सकाळी अचानक गुजरातमधून मजूर भरुन आलेले अनेक वाहने महाराष्टÑाच्या सीमेवर दाखल झाले. ही माहिती प्रशासनाला मिळताच पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी तेथे दाखल होऊन त्यांना महाराष्टÑात येण्यास मज्जाव केला. यासंदर्भात काही कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. काही अधिकाऱ्यांनी या मजुरांनी गुजरातमध्ये पुन्हा परत जावे यासाठी देखील प्रयत्न केला. पण गुजरात प्रशासनाने मात्र त्यास नकार दिला. हा विषय थेट पालकमंत्री अॅड.के.सी. पाडवी यांच्यापर्यंत गेला. हे सर्व परतलेले मजूर त्यांच्याच मतदारसंघातील असल्याने त्यांनी तोडगा काढावा, अशी गळ कार्यकर्त्यांनी त्यांना घातली. अखेर चर्चेनंतर या मजुरांना महाराष्टÑाच्या सीमेत येऊ देण्याचा निर्णय झाला. या सर्व मजुरांची प्राथमिक आरोग्य तपासणी करावी व त्यांना त्यांच्या गावी जाऊ देण्याबाबत निर्णय झाला. त्या मजुरांना त्यांच्या घरात क्वारंटाईन करण्यात येणार आहे. सायंकाळी उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान दुपारच्या रखरखत्या उन्हात सहा महिने ते पाच वर्षांची लहान लेकरे घेत माता तपासणीसाठी जात होत्या़ घरी जाण्याच्या ओढीने त्या ऊनही सहन करत होत्या़
दरम्यान, सकाळी सातपासून आलेल्या मजुरांना सावळदा, ता.नंदुरबार या गावाच्या पुढे गुजरातमध्ये थांबवून ठेवण्यात आले होते. चार तासाच्या चर्चेनंतर त्यांची वाहने आमलाड, ता.तळोदा येथे सुमारे ३० किलोमीटर माघारी पाठविण्यात आले. तेथे त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. दुपारी चारच्या सुमारास ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांची वाहने गावाकडे रवाना करण्यात आली. सकाळी सात ते दुपारी चारपर्यंत मात्र रखरखत्या उन्हात मजुरांचे प्रचंड हाल झाले. लहान बाळ असलेल्या महिलांचे अधिकच हाल झाले.