रोजी गेली, तरी जिल्ह्यातील एक लाख कुटुंबांना मिळणार रोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:27 IST2021-04-19T04:27:21+5:302021-04-19T04:27:21+5:30

नंदुरबार : गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय कुटुंबातील रेशनकार्डधारकांना तब्बल आठ महिने मोफत रेशन पुरवठा ...

One lakh families in the district will get bread | रोजी गेली, तरी जिल्ह्यातील एक लाख कुटुंबांना मिळणार रोटी

रोजी गेली, तरी जिल्ह्यातील एक लाख कुटुंबांना मिळणार रोटी

नंदुरबार : गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय कुटुंबातील रेशनकार्डधारकांना तब्बल आठ महिने मोफत रेशन पुरवठा करण्यात आला होता. आता त्याच अनुषंगाने यावेळीही राज्य सरकारने लावलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर एक महिन्याचे धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील एक लाख चार हजार ९५३ कुटुंबांना मिळणार आहे. हे धान्य वाटपासंदर्भात नियोजन करण्यात येत आहे.

कोरोनामुळे राज्य सरकारने १५ एप्रिलपासून १ मे पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. नंदुरबार जिल्ह्यात मात्र स्थानिक प्रशासनाने १ एप्रिलपासूनच संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले असून अनेकांचे संसार उघड्यावर येण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता राज्य शासनाने दारिद्र रेषेखालील कुटुंबांना एक महिन्याचे मोफत धान्य रेशन दुकानातून पुरविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनातर्फे नियोजन सुरू आहे. लवकरच रेशन दुकानदारांना हे धान्य पुरविण्यात येणार असून त्यांच्या मार्फत लाभार्थी कुटुंबांना ते पुरविले जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अशा कुटुंबांना एक आधार मिळणार आहे.

गहू व तांदूळ मिळणार

राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे लाभार्थी कुटुंबांना गहू व तांदूळ मिळणार आहे. त्या अनुषंगाने रेशन दुकानदारांना लाभार्थी संख्येप्रमाणे धान्याचा कोटा दिला जाणार आहे.

n कोरोनाच्या आठ महिन्यांच्या काळात अर्थात एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्याच्या कालावधीत शासनातर्फे मोफत गहू व तांदूळ वाटप करण्यात आले. यामुळे अनेक कुटुंबांची गैरसोय दूर झाली होती.

nजिल्ह्यात दोन लाख ३६ हजार ५०१ कुटुंबांना या योजनेचा लाभ झाला होता. त्यांना दोन लाख ७० हजार १३६ क्विंटल तांदूळ तर एक लाख ८० हजार ४०० क्विंटल गहू वाटप झाला.

कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यामुळे कडक उपाययोजना करणे आवश्यक होते. त्या उपाययोजनांच्या आधारे संचारबंदी लागू केली असून ते योग्यच आहे. ते करतांना शासनाने आमच्या सारख्या कुटुंबांचीही काळजी केल्याने तो एक आधार मिळाला आहे.

-एक लाभार्थी कुटुंब प्रमुख, नंदुरबार.

कोरोनामुळे अनेकांची रोजीरोटी गेली आहे. गेल्या वर्षी शासनाने मोफत धान्याचा आधार दिला होता. साधारणत: आठ महिने मोफत धान्य मिळत होते. आता देखील राज्य शासनाने अशा कुटुंबांची काळजी घेतली असल्याने समाधानाची बाब आहे.

-एक लाभार्थी, शहादा.

Web Title: One lakh families in the district will get bread

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.