दीड हजार विद्यार्थी व मजूर गुवाहाटीकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 12:31 IST2020-05-29T12:31:07+5:302020-05-29T12:31:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या जामिया संकुल येथील १,५१८ विद्यार्थी तसेच जिल्ह्यातील अन्य ७० मजूर असे ...

दीड हजार विद्यार्थी व मजूर गुवाहाटीकडे रवाना
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या जामिया संकुल येथील १,५१८ विद्यार्थी तसेच जिल्ह्यातील अन्य ७० मजूर असे १,५८८ प्रवाशांना विशेष श्रमीक एक्स्प्रेसने झारखंड, बंगाल व आसामला पाठविण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत,अविश्यांत पांडा, अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील,उपजिल्हाधिकारी कैलास कडलग,अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, उपशिक्षणअधिकारी डॉ.युनूस पठाण, रेल्वेचे सहायक परीचालन प्रबंधक गुलाबसिंग गहलोत, जामिया संकुलाचे अध्यक्ष मौलाना गुलाम वस्तानवी, प्रिन्सिपल रफीक जहागिरदार, मौलाना जावेद पटेल आदी उपस्थित होते. रेल्वेने प्रवास करणाऱ्या मजूरांमध्ये नंदुरबार येथील २६, तळोदा ७, नवापुर १८ , शहादा १२ तसेच साक्री येथील ७ अशा ७० मजूरांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थी व मजूराची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दुपारी १ वाजेच्या सुमारास रेल्वे नंदुरबार स्थानकात दाखल झाली. प्रवाशांसह ही रेल्वे विद्यार्थी व मजूरांना घेवून गोहाटीच्या दिशेने २ वाजून ४० मिनीटांनी रवाना झाली.
यावेळी पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नागरिकांना बसमधून उतरवून सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत सर्वांना रेल्वेत बसविण्यात आले. जामिया मार्फत सर्व प्रवाशांना पिण्याचे पाणी, भोजन सामुग्री आणि मास्क उपलब्ध करून देण्यात आले होते. दुपारी एक वाजता बसेस भरून विद्यार्थी नंदुरबारात दाखल झाले. त्यानंतर त्यांना क्रमाक्रमाने रेल्वे स्थानकात आणण्यात आले. तेथे शिस्तीने त्यांना फलाटावर नेवून रेल्वेत बसविण्यात आले. यावेळी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेतली गेली.