लाॅकडाऊनमधून पोळून निघालेल्या दीड हजार मोठ्या व लघुउद्योगांनी घेतली भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:32 IST2021-03-23T04:32:24+5:302021-03-23T04:32:24+5:30
नंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागाचा समावेश असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील उद्योगधंद्यांना सलग तीन महिन्यांच्या लाॅकडाऊनमुळे १५० कोटी रुपयांचा फटका बसला ...

लाॅकडाऊनमधून पोळून निघालेल्या दीड हजार मोठ्या व लघुउद्योगांनी घेतली भरारी
नंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागाचा समावेश असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील उद्योगधंद्यांना सलग तीन महिन्यांच्या लाॅकडाऊनमुळे १५० कोटी रुपयांचा फटका बसला होता. यातून सावरत हे उद्योग आता पुन्हा उभारी धरत असून, यातून नवीन मार्ग सापडून नव्याने अर्थकारणाला सुरुवात झाली आहे.
मार्च २०२०पासून लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे जनजीवन थांबले होते. यात नंदुरबार जिल्ह्यातील दीड हजार उद्योग समूहांचा समावेश होता. कालांतराने ३३ टक्के कामगारांसह उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली खरी; परंतु उत्पादनवाढीसाठी लागणारे मनुष्यबळ, कच्चा माल याचा अभाव असल्याने उद्योगाची गाडी रुळावर येतच नव्हती, जून महिन्यात सुरू झालेल्या उद्योगांना खऱ्या अर्थाने ऑक्टोबर २०२०पासून उभारी मिळण्यास सुरुवात झाली. यात जिल्हा उद्योग केंद्रातून चालवण्यात येणारे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री रोजगार उन्नती कार्यक्रम सर्वाधिक मदतीचे ठरले होते. याअंतर्गत बँकांकडे ५० लाख रुपयांचे उद्योग सुरू करण्यासाठी प्रस्ताव उद्योजकांकडून देण्यात आले होते. यातून नंदुरबार जिल्ह्यात ३० कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन त्यातून उत्पादन सुरू होऊन रोजगार निर्मिती झाली आहे. हे उद्योग सुरू करण्यासाठी शासनाकडूनही तातडीने परवानगी देण्यात आल्याने जिल्ह्यातील उद्योगधद्यांना लाभ झाला.
लाॅकडाऊन काळानंतर उभ्या राहणाऱ्या उद्योगांना रोजगार उन्नती कार्यक्रम हा सर्वाधिक लाभदायकही ठरला होता. २०१९ -२० या वर्षात ४६ नवे उद्योग सुरू करण्यात आले होते. यातून २३ कोटी ५० लाख रुपयांची थेट गुंतवणूक झाल्याने जिल्ह्यातील उद्योग व्यवसायाचा आलेख हा वर सरकता राहिला होता. प्रामुख्याने कुशल आणि अशकुल अशा दोन्ही क्षेत्रांतील मजुरांना रोजगार उपलब्ध झाल्याने अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली नव्हती. प्रामुख्याने मिरची, मसाले, जिनिंग, प्रेसिंग, काॅटन सीड, ऑइल मिल, फूड प्रोसेसिंग युनिट, कृषिपूरक साहित्यनिर्मिती, फळप्रक्रिया, दुग्धोत्पादन आदी उद्योग बळकट होत गेल्याने लाॅकडाऊननंतरची बेकारीची लाट जिल्ह्यावर आली नाही.
एक हजार ४४६ लघुउद्योग
नंदुरबार जिल्ह्यात दोन मोठे उद्योग आहेत, तर एक हजार ४४६ लघुउद्योग आहेत. मोठ्या उद्योगामध्ये ऑइल मिल व डाळ मिल यांचा समावेश आहे. लाॅकडाऊन उघडल्यानंतर ऑइल मिलमधील पुन्हा जुन्या वेगाने सुरू झाल्या होत्या.
जिल्ह्यात मिरची प्रक्रिया मसाले, इंजिनिअरिंग, कृषिपूरक, उद्योग, दुग्धोत्पादन यांसह विविध उद्योगांचा समावेश आहे. लाॅकडाऊन उघडल्यानंतर नवापुरातील वस्त्रोद्योग, नंदुरबारातील मिरची व मसाले उद्योग स्थिरस्थावर होण्यास बराच वेळ लागला; परंतु कच्च्या मालाच्या उपलब्धतेनुसार हे उद्योग सुरू आहेत. एकीकडे हे उद्योग सुरू असताना दुसरीकडे जिल्ह्यातील दहा कोल्डस्टोरेजही सुरळीत सुरू असल्याची माहिती जिल्ह्यातील कोल्डस्टोरेज दोन महिने बंद राहिल्याने गेल्या वर्षात मोठे नुकसान व्यापाऱ्यांना सहन करावे लागले होते. मालाचा साठा झाला असला तरी तो काढण्यासाठी मजूरच नसल्याने मोठ्या अडचणींना व्यापाऱ्यांनी तोंड दिले हाेते.