दीड हजार मजूर रेल्वेने जिल्ह्यात परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 12:54 IST2020-05-15T12:54:34+5:302020-05-15T12:54:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गुजरात राज्यातील जुनागढ येथे मजुरीसाठी गेलेले जिल्ह्यातील दीड हजार आदिवासी मजूर श्रमिक एक्सप्रेसने नंदुरबारला ...

One and a half thousand laborers returned to the district by train | दीड हजार मजूर रेल्वेने जिल्ह्यात परतले

दीड हजार मजूर रेल्वेने जिल्ह्यात परतले


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गुजरात राज्यातील जुनागढ येथे मजुरीसाठी गेलेले जिल्ह्यातील दीड हजार आदिवासी मजूर श्रमिक एक्सप्रेसने नंदुरबारला परतले. या मजुरांना आपल्या गावी आणण्यासाठी पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी यांनी विशेष प्रयत्न केले. या सर्व मजुरांना राज्य परिवहन महामंडळाच्या ५२ बसेसने त्यांच्या गावी पाठविण्यात आले.
या वेळी सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पांडा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, तहसीीलदार भाऊसाहेब थोरात, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जे.आर. तडवी, पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर आदी उपस्थित होते. जिल्ह्याच्या विविध भागातील हे मजूर लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते. लॉकडाऊनचा कालावधी वाढविल्यानंतर या मजुरांकडून आपल्या मूळ गावी जाण्याची मागणी करण्यात येत होती. त्या सर्व मजुरांना आणण्यासाठी विशेष श्रमिक रेल्वेची व्यवस्था करण्याचे निर्देश पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी यांनी राज्याच्या मुख्य सचिव आणि मदत व पुनर्वसन सचिवांना दिले होते. त्यांनी गुजरातमधील प्रशासनाशीदेखील संपर्क साधला होता. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी यासंदर्भात जुनागढ प्रशासनाशी समन्वय साधला. या प्रयत्नांमुळे हे सर्व मजूर सुखरुप नंदुरबार रेल्वेस्थानकावर पोहोचले. बुधवारी रात्री साडेनऊ वाजता जुनागढ येथून विशेष श्रमिक एक्सप्रेसने सर्व मजूर निघाले आणि गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता नंदुरबार रेल्वेस्थानकावर पोहोचले. रेल्वेस्थानकावर आगमन झाल्यानंतर १० डॉक्टर व १० आरोग्य सेवकामार्फत बोगीनुसार प्रत्येक मजुरांचे थॅर्मल स्कॅनिंग करण्यात आले. त्यांच्या हातावर होम क्वॉरंटाईनचा शिक्का मारुन त्यांची नोंद घेण्यात आली. सर्व मजुरांना तालुकानिहाय अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आले. त्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत ५२ बसेसची व्यवस्था करण्यात आलेली होती. मूळगावी परल्यानंतर सर्व मजुरांना त्यांच्या घरी १४ दिवस क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. यावेळी रेल्वेस्थानकावर गर्दी होऊ नये म्हणून परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गुजरातमधून आलेल्या प्रवाशांमध्ये अक्कलकुवा २७, तळोदा २५३, धडगाव २२, नंदुरबार ८०, नवापूर सात व शहाद्यातील एक हजार १०१ असे नंदुरबार जिल्ह्यातील एक हजार ४९० प्रवासी होते. तर शिरपूर येथील १० मजूरही याच रेल्वेने परतले. मजुरांच्या तिकीटाचा खर्च सहा लाख ३७ हजार ५०० रुपये न्यूक्लिअस बजेटमधून करण्यात आला आणि त्याची रक्कम जुनागढ प्रशासनाला देण्यात आली होती.

शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथील सरिता ठाकरे महिलेने बुधवारी रात्री श्रमिक एक्सप्रेसमध्ये एका कन्येला जन्म दिला. या महिलेला रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय तपासणी करून तिला मूळ गावी पोहोचविण्यात येणार आहे. बाळासह आपल्या गावी जाण्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होते.
जिल्ह्यात सुखरुप पोहचलेल्या मजुरांच्या चेहºयावर आनंद दिसत होता. त्या सर्वांनी पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी, शासन व प्रशासनाचे आभार मानले.

राज्यातील इतर जिल्ह्यात किंवा परराज्यात अडकलेल्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना परत आणण्यासाठी आदिवासी विभागामार्फत प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी न्यूक्लिअस बजेटमधून खर्च करण्याच्या सूचना प्रकल्प कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. गुरुवारी दीड हजार मजूर आपल्या गावी पोहोचले याचे समाधान आहे. जिल्ह्यातील इतरही नागरिकांना परत गावी यायचे असल्यास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.
-अ‍ॅड.के.सी. पाडवी, पालकमंत्री.


 

Web Title: One and a half thousand laborers returned to the district by train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.