जिल्ह्यात दीड हजार अंगणवाड्यांमध्ये उन्हाळ्यापूर्वी निर्माण होणार जलसंकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:43 IST2021-02-27T04:43:12+5:302021-02-27T04:43:12+5:30
सातपुड्याच्या दुर्गम भागासह सपाटीच्या तालुक्यांमध्ये महिला आणि बालविकास विभागाचे काम सोपे व्हावे यासाठी जिल्ह्यात १२ प्रकल्प कार्यालये तयार करण्यात ...

जिल्ह्यात दीड हजार अंगणवाड्यांमध्ये उन्हाळ्यापूर्वी निर्माण होणार जलसंकट
सातपुड्याच्या दुर्गम भागासह सपाटीच्या तालुक्यांमध्ये महिला आणि बालविकास विभागाचे काम सोपे व्हावे यासाठी जिल्ह्यात १२ प्रकल्प कार्यालये तयार करण्यात आली आहेत. यांतर्गत २ हजार ४४० अंगणवाड्या तयार करण्यात आल्या आहेत. या अंगणवाड्यांमधून दैनंदिन पोषण आहार देण्यासह विविध प्रकारच्या पोषण योजनाही राबवण्यात येतात. दैनंदिन पोषण आहार मिळत असल्याने लहान बालकेही याठिकाणी सकाळी न चुकता हजेरी लावत आहेत. दिवसेंदिवस अंगणवाड्यांचे काम सुधारत असले तरीही समस्यांचा ससेमिरा काही सुटत नसल्याचे समोर आले आहे आहे. धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील सहा प्रकल्पातील अंगणवाड्यांमध्ये मोजक्याच ठिकाणी नळ कनेक्शन उपलब्ध असल्याचे दिसून आले आहे. तब्बल दीड हजार ठिकाणी नळच नसल्याने महिला सेविका व मदतनीस यांना पिण्याचे पाणी आणि अन्न शिजवण्यासाठी बाहेरुन पाणी आणावे लागत आहे. नर्मदा काठावरील अंगणवाड्यांसाठी डोंगर उतरुन पाणी आणावे लागण्याची कसरत करावे लागत असल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. तर दुसरीकडे दुर्गम भागातील विविध भागात पाणी आणण्यासाठी मदतनीस अर्धा किलोमीटरची पायपीट करत असल्याचे दिसून आले आहे.
धडगाव तालुक्यातील पाचशेच्या जवळपास अंगणवाड्या ह्या नळ कनेक्शन नसलेल्या आहेत. अंगणवाड्यांना ग्रामपंचायतीकडून कनेक्शन देणे अपेक्षित असतानाही कारवाई मात्र झालेली नाही.