मुक्कामाला येणारी बस आगारातच थांबली ; प्रवाशांची गैरसोय वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:32 IST2021-07-30T04:32:50+5:302021-07-30T04:32:50+5:30

नंदुरबार : जिल्ह्यातील चार आगारांची निर्बधांमुळे आर्थिक उत्पन्नात घसरगुंडी सुरू आहे. ग्रामीण मार्गांवर प्रवासीच मिळत नसल्याने बसेस आगारात पडून ...

The oncoming bus stopped at the depot; Increased inconvenience to passengers! | मुक्कामाला येणारी बस आगारातच थांबली ; प्रवाशांची गैरसोय वाढली!

मुक्कामाला येणारी बस आगारातच थांबली ; प्रवाशांची गैरसोय वाढली!

नंदुरबार : जिल्ह्यातील चार आगारांची निर्बधांमुळे आर्थिक उत्पन्नात घसरगुंडी सुरू आहे. ग्रामीण मार्गांवर प्रवासीच मिळत नसल्याने बसेस आगारात पडून आहेत. यातही मुक्कामी बसेस बंद असल्याने आगारांचे आर्थिक उत्पन्न निचांकी झाले असल्याचे चित्र आहे. यामुळे चार वाजेनंतरचे निर्बंध शिथिल झाल्यास एसटीला प्रवासी मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

नंदुरबार आगारातून दरदिवशी सध्या ३० हजार किलोमीटरचा प्रवास करत आहेत. यातून दिवसाला आठ लाखांची कमाई होत असली तरी चार वाजेनंतर आगाराच्या बसेस बंद पडत आहेत. हीच गत शहादा, नवापूर आणि अक्कलकुवा आगाराची झाली आहे. यातून रात्री शहरी आणि ग्रामीण भागात जाणाऱ्या सुमारे १५० पेक्षा अधिक बसेस सध्या आगारातच थांबल्याचे दिसून आले आहे. सध्या डिझेलच्या दरवाढीमुळे प्रवासी त्याच मार्गावर बसेस असे धोरण आगारांनी अंगीकारले आहे. यातून काही ठिकाणी बसेस प्रवासी न मिळाल्यास ती बस आगारातून रद्द केली जाते. आगारांकडून ज्या मार्गाला प्रवासी अधिक अशाच बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. मुंबई, नाशिक, पुणे या मार्गावरच्या रातराणी बसेस पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. यातून आगारांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. कोरोनापूर्वी चार आगारांचे दैनंदिन उत्पन्न हे ३५ लाखांच्या घरात होते. हे उत्पन्न आता आठ ते दहा लाखांपर्यंत आल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या काळात शासनाने निर्बंध उठवल्यानंतरही डिझेल दरवाढीमुळे भाडेवाढीशिवाय बसेस चालणार नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील चारही आगारांना सध्या डिझेलसाठी दर आठवड्याला किमान ११ लाख रुपयांची गरज भासते. हा पैसा गोळा झाल्यावरच डिझेल मागवून बसेस चालवल्या जात आहेत. गेल्या वर्षापेक्षा यंदा डिझेलचे दर अधिक वाढल्याने एसटीपुढे अनेक समस्या निर्माण होत आहेत. यामुळे येत्या काळात भाडेवाढ निश्चित मानली जात आहे.

चार आगारांनी ज्या मार्गावर अधिक प्रवासी तेच मार्ग सुरू ठेवले आहेत. दुपारी चार वाजेपर्यंत बसेस सुरू असतात.

ग्रामीण भागातील दिवसाच्या फेऱ्याही बंद आहेत. विद्यार्थी वाहतूक कमी असल्याने आगारांना अद्याप म्हणावा तसा लाभ मिळत नाही.

चार वाजेनंतर प्रवासीच येत नसल्याने बसस्थानकातून बसेस सोडण्यास सध्या तरी नकार दिला जात आहे.

नंदुरबार आगाराचे उत्पन्न हे कमी झाले आहे. परंतू ते वाढवण्याचा प्रयत्न आगार करत आहे. ज्या मार्गांवर प्रवासी असतील अशा मार्गांवरच बसेस सुरू ठेवाव्यात असे नियोजन करत आहोत. चार वाजेनंतर सर्वत्र शुकशुकाट होत असल्याने रात्री पाठवण्यात येणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत. येत्या काळात शासनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुढील नियोजन करत बसेस सुरू ठेवू.

-मनोज पवार,

आगारप्रमुख, नंदुरबार

कोराेना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. यामुळे आगारांनी बसेस सुरू करायला हव्यात, ग्रामीण भागात बसेसची अपेक्षा आहे. तालुक्याच्या गावी जाण्यासाठी शेतकरी बसचा वापर करतात. गेल्या अनेक वर्षापासून हा प्रवास सुरू आहे. हा प्रवास खंडित करू नये.

-पुरुषोत्तम पाटील, प्रवासी,

शहादा ते नंदुरबार असा नियमित प्रवास करत आहे. यासाठी बस हा एकमेव चांगला पर्याय आहे. हा पर्याय चांगला असला तरी बसेस कमी झाल्या आहेत. बससाठी ताटकळत बसावे लागते. एसटी आगाराने बसेस वाढवून प्रवाशांची सोय करावी.

-महेश पाटील, प्रवासी,

Web Title: The oncoming bus stopped at the depot; Increased inconvenience to passengers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.