बेशिस्त वाहनधारकांमुळे वाहतुकीला अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:32 IST2021-07-28T04:32:07+5:302021-07-28T04:32:07+5:30
शहरातील जुने तहसील ते नगरपालिका या मुख्य रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. रस्त्याच्या आजूबाजूला वस्तू विक्रेते हातगाडी लावतात. त्यातच बाजार ...

बेशिस्त वाहनधारकांमुळे वाहतुकीला अडथळा
शहरातील जुने तहसील ते नगरपालिका या मुख्य रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. रस्त्याच्या आजूबाजूला वस्तू विक्रेते हातगाडी लावतात. त्यातच बाजार करण्यासाठी आलेले नागरिक आपली वाहने रस्त्याच्या दुतर्फा लावत असल्याने वाहने निघण्यासाठी जागाच शिल्लक राहत नसल्याने वारंवार वाहतूक ठप्प होते. कोरोना महामारीमुळे रस्ते बॅरेकेडिंग केल्यामुळे वाहनांना बंदी करण्यात आली होती. मात्र, महिनाभरापासून निर्बंध शिथिल झाल्याने शहरात वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यातच काही नागरिक बेफिकीरपणे आपली वाहने कुठेही लावत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. मंगळवारी आठवडा बाजार भरल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. शहरातील जुनी भाजी मंडी ते जुने तहसील कार्यालयादरम्यान रस्त्यावर काही वाहनचालकांनी वाहने रस्त्यावर लावून बाजार करण्यासाठी निघून गेले. त्याठिकाणी किरकोळ अपघातही झाला. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला. बेकायदेशीरपणे रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.