मंदाणे गावात बाधितांची संख्या पोहोचली ४० वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:31 IST2021-04-01T04:31:10+5:302021-04-01T04:31:10+5:30
प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देण्यात येऊनही नागरिक, तरुण वर्ग बिनधास्तपणे वावरत असल्याने दिवसेंदिवस धोका वाढू लागला आहे. त्यामुळे गावात कडक ...

मंदाणे गावात बाधितांची संख्या पोहोचली ४० वर
प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देण्यात येऊनही नागरिक, तरुण वर्ग बिनधास्तपणे वावरत असल्याने दिवसेंदिवस धोका वाढू लागला आहे. त्यामुळे गावात कडक लॉकडाऊन करण्याची मागणी जोर धरत आहे. मंदाणे गाव हे प्रमुख बाजारपेठेचे केंद्र असल्याने परिसरातील नागरिकांची मोठी वर्दळ असते. तसेच गावाच्या चारही बाजूने जोडणारे रस्ते असल्याने गावात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याबरोबरच पुणे, मुंबई, नाशिकसारख्या भागातून व मध्य प्रदेशातून येणारे नागरिक गावात प्रवेश करीत असल्याने याची माहिती कोणालाही होत नाही. येणाऱ्या लोकांवर प्रशासनाने नजर ठेवून विनापरवानगी गावात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची सखोल चौकशी होऊन त्यांना क्वारंटाईन केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, महसूल विभाग यांच्याकडून वेळोवेळी कडक सूचना देण्यात येऊनही नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, असे चित्र दिसून येत आहे. सार्वजनिक जागी थुंकणे, फिरणे, मास्क न लावणे, गुटखा खाणे, डिस्टन्स न पाळणे असे प्रकार सुरू असल्याने कोरोना महामारीचे संक्रमण वाढू लागले आहे. मंदाणे गावात आतापर्यंत बाधितांची संख्या ४० वर पोहोचली आहे. तसेच नऊ ते दहाजणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. कुटुंबातील प्रमुख आधारस्तंभ असलेले स्री-पुरुष दगावल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
परिसरातील असलोद, कर्जोत, उजळोद, डोंगरगाव, ओझर्टे, कमरावद, सावखेडा या गावातही बाधितांची संख्या वाढत आहे. या आजाराचे संक्रमण होऊ नये म्हणून प्रत्येकाने शासकीय नियमांचे काटेकोर पालन करून घराबाहेर पडण्याचे टाळावे, असे आवाहन सरपंच विजय सनेर, उपसरपंच अनिल भामरे, ग्रामविकास अधिकारी दिनेश पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र पाटील, पोलीसपाटील सुभाष भिल, पं. स.च्या माजी सदस्या सुषमा साळुंके व ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.