कोरोनामुक्तचा आकडा वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 11:33 IST2020-06-22T11:33:36+5:302020-06-22T11:33:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा स्थिर आहे. रविवारी पुन्हा ४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता ...

कोरोनामुक्तचा आकडा वाढतोय
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा स्थिर आहे. रविवारी पुन्हा ४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता एकुण ४१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. बहुचर्चित जेवनावळीचा खानसामाचा देखील समावेश आहे. दुपारी आलेले सर्वच ३९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा रुग्णालयात उपचार घेणारा वर्ग एकचा अधिकाऱ्याचा दुसरा स्वॅब निगेटिव्ह आला आहे. तिसरा स्वॅबही निगेटिव्ह आल्यास त्यांना देखील डिस्चार्ज दिला जाणार आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यात कोरोनाने कहर केला होता. ३४ वरून रुग्णांचा आकडा थेट ७८ पर्यंत गेला होता. यात दोन परिवरातील १४ जणांचा समावेश होता. याशिवाय परजिल्ह्यातून अर्थात प्रतिबंधीत क्षेत्रातून आलेल्यांचा देखील मोठ्या प्रमाणावर समावेश होता. ही बाब लक्षात घेता प्रशासनाने बाहेरून येणाऱ्यांवर कडक निर्बंध घातले शिवाय जिल्ह्यातील नंदुरबार व तळोदा शहरात चार दिवसांचा संपुर्ण लॉकडाऊन घोषीत करण्यात आला होता. त्यामुळे संपर्क साखळी तोडण्यात यश आले होते.
दोन आठवडे खडतर...
जुनच्या दुसºया आठवड्यापासून जिल्ह्यात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर आढळून येत होती. जे तालुके कोरोनामुक्त होते त्या तालुक्यांमध्ये देखील कोरोना रुग्ण आढळून आले. त्यात दुर्गम भागातील मोलगी, तळोदा शहर, ग्रामिण भागातील लोणखेडा, मंदाणा या गावांचा समावेश आहे.
यातील ८० टक्के रुग्ण हे बाहेर गावाहून आलेले आहेत. त्यामुळे त्यांना जिल्ह्यातील संपर्क साखळीतून कोरोना झालेला नाही हे स्पष्ट होते. परंतु त्यांच्यामुळे काही स्थानिकांना कोरोना झाला हा भाग वेगळा. त्यावरही आता नियंत्रण मिळू लागले आहे.
चार दिवसांपासून दिलासा
गेल्या चार दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येतून दिलासा मिळाला आहे. गुरुवारपासून जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. शुक्रवारी दुधाळे शिवारातील रुग्ण आढळून आला असला तरी तो रुग्ण नाशिक येथे डिटेक्ट झाला असून तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रविवारी सकाळपर्यंत ७८ अहवालांची प्रतिक्षा होती. त्यातून ३९ अहवाल प्राप्त झाले होते ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. यात तळोदा येथील संपर्क साखळीतील व्यक्तींसह जिल्हा रुग्णालयातील कर्मचाºयांचा स्वॅब रिपोर्टचा देखील समावेश आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
संपर्क साखळी तोडण्यात यश
गेल्या १५ दिवसात वाढलेल्या रुग्णांच्या पार्श्वभुमीवर संपर्क साखळी वाढत जाऊ नये यासाठी नंदुरबारात ४ दिवस लॉकडाऊन करण्यात आले. तळोदा देखील लॉकडाऊन करण्यात आले. याशिवाय मंदाणा आणि लोणखेडा येथेही आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे संपर्क साखळी तुटल्याने कोरोनावर ब्रेक लावता आला आहे. परिणामी चार दिवसात एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
याशिवाय मुंबईसह इतर कोरोना प्रतिबंधीत क्षेत्रातून येणारे नागरिक विनापरवाना आल्यास व ते कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास अशा व्यक्तींवर थेट गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम दिसून आला आहे. प्रतिबंधीत क्षेत्रातून आलेले व्यक्ती आता थेट जिल्हा रुग्णालयात किंवा स्थानिक रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी जात आहेत.
सध्याची स्थिती कायम राहू देण्यासाठी आता सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील कमीत कमी गावांमध्ये कोरोना रुग्ण राहिल्यास त्याचा परिणाम पुढील महिन्यापासून काही भागात शाळा सुरू करण्यासाठी मदतीसाठी होणार आहे. याशिवाय १ जुलै पासून पुढील टप्प्याचे अनलॉकडाऊनमध्येही अनेक बाबींमधून सूट मिळू शकणार आहे. येत्या काळातील सण, उत्सव लक्षात घेता कोरोनाचा फैलाव जास्त होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. संपर्क साखळी पुन्हा वाढणार नाही यासाठी प्रयत्न करावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
रविवारी चार जण कोरोनामुक्त झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. या रुग्णांमध्ये नंदुरबारात दोन आठवड्यांपूर्वी गाजलेल्या नगरसेवक परवेजखान यांच्या मुलाच्या लग्नाच्या जेवनावळीतील कथीत खानसामाचा समावेश आहे. याशिवाय जिल्हा रुग्णालयातील दोन परिचारिका आणि नंदुरबारातीलच राजीव गांधी नगरातील एका व्यक्तीचा समावेश आहे. यामुळे कोरोनामुक्तांची संख्या आता ४१ झाली आहे. सद्य स्थितीत ३२ जण कोरोनावर उपचार घेत आहेत. यातील पाच जणांना लवकरच कोरोनामुक्त घोषीत करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यांचे दुसरे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.