मंत्रीपदासाठी नव्हे तर खान्देशच्या विकासासाठी पक्षांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 22:10 IST2020-11-04T22:09:56+5:302020-11-04T22:10:48+5:30
रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आपल्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीत खान्देशातील विकासाचे अनेक ड्रीम प्रोजेक्टचे आपण बिजारोपण ...

मंत्रीपदासाठी नव्हे तर खान्देशच्या विकासासाठी पक्षांतर
रमाकांत पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आपल्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीत खान्देशातील विकासाचे अनेक ड्रीम प्रोजेक्टचे आपण बिजारोपण केले होते. भाजपने चार वर्षे कुठलीही संधी न दिल्याने नाईलाजास्तव आपले स्वप्नातील विकास प्रकल्प साकारण्यासाठी पक्षनेते शरद पवार यांच्याशी त्यासंदर्भात चर्चा करुनच आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच ते नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले होते. या जिल्ह्यात त्यांच्या समर्थकांची संख्या मोठी असल्याने जिल्ह्यातील कोणते कार्यकर्ते त्यांच्यासोबत जातात याबाबतही सर्वांना उत्सुकता होती. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी झालेला संवाद असा :
प्रश्न- नंदुरबार जिल्ह्यातील कोणते कार्यकर्ते आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत?
खडसे- या जिल्ह्यात भाजप वाढविण्यासाठी मी सुरुवातीपासून प्रयत्न केला आहे. त्यामुळे समर्थकांची संख्या निश्चितच मोठी आहे. आपले नातेसंबंधही मोठे आहे. त्यामुळे व्यक्तीगत प्रेम करणाऱ्यांची संख्या केवळ भाजपमध्येच नव्हे तर सर्वच पक्षात आहे. बहुतांश कार्यकर्ते आज कुठल्या ना कुठल्या पदावर अथवा लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत. त्यामुळे काही बंधने आहेत. पण जेव्हा वेळ येईल तेव्हा मोठ्या संख्येने कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून हा पक्ष जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष ठरेल.
प्रश्न- राष्ट्रवादी काँग्रेसमधील आपला प्रवास पुढे कसा राहणार?
खडसे- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण कुठल्याही अटी-शर्तीवर प्रवेश केलेला नाही. भाजपमध्ये पक्ष वाढविण्यासाठी आपण रक्ताचे पाणी केले. पण गेल्या चार वर्षात या पक्षाने आपल्याला अतिशय वाईट वागणूक दिली, ते साऱ्या महाराष्ट्राने पाहिले. आपल्यावर नको ते आरोप लावण्यात आले. आरोप करणारेदेखील कोणी चांगले लोक असते तर तेही समजू शकलो असतो. पण कुणीही आरोप केले आणि त्याची चौकशी लावून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. मानसिकदृष्ट्या छळ करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे चार वर्षे आपण पूर्णपणे थांबलो होतो. अशा स्थितीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आपल्याला संधी दिली. त्यामुळे पुन्हा सामाजिक जीवनात काम करण्याची उभारी मिळाली आहे.
प्रश्न- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याला मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा आहे?
खडसे- आपण मंत्रीपद अथवा इतर कुठल्याही पदासाठी पक्षांतर केलेले नाही. आपल्या राजकीय जीवनात आपण खूप पदे, मंत्रीपदे उपभोगली. त्यामुळे आता त्याबाबतची अपेक्षा राहिली नाही. पण राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करीत असताना विकासाचे अनेक नवीन प्रकल्प आपण राबवले. विशेषत: खान्देशसाठी काही ड्रीम प्रोजेक्ट होते. त्यातील काही पूर्ण झाले तर काहींना सुरुवात झाली आहे. ते ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी आपण पक्षांतर केले. त्यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशीही मोकळेपणाने चर्चा झाली आहे. त्यासाठी त्यांची मदत मिळणार आहे.
प्रश्न- खान्देशसाठी कोणते ड्रीम प्रोजेक्ट बाकी आहेत?
खडसे- कृषी विद्यापीठ खान्देशात व्हावे यासाठी आपले प्रयत्न होते. राहुरी कृषी विद्यापीठाचा विस्तार मोठा असल्याने त्याचे विभाजन करण्यासंदर्भात समितीने अहवाल दिला आहे. त्यामुळे नवीन कृषी विद्यापीठ हे खान्देशमध्ये व्हावे यासाठी आपण प्रयत्न सुरू केले होते. त्यासाठी प्राथमिक सर्वेक्षणही झाले आहे. धुळे किंवा जळगाव जिल्ह्यात ते जागा व इतर निकषानुसार होऊ शकेल, ते कुठल्या जिल्ह्यात होईल तो भाग वेगळा. पण खान्देशमध्येच हे नवीन विद्यापीठ व्हावे यासाठी आपला पाठपुरावा होता आता त्या कामाला निश्चित गती येईल. तसेच आपल्या पाटबंधारे मंत्रीपदाच्या काळात आपण अनेक धरणांची कामे सुरू केली आणि पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला. या धरणांमध्ये आज पाणीसाठा आहे पण शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत ते पाणी पोहोचले नाही. त्यामुळे सारंगखेडा, प्रकाशा बॅरेजच्या उपसा योजनांचे पुनर्जीवन, सुसरी, देहली व धुळे-जळगाव जिल्ह्यातील धरणांची उर्वरित कामे करायची आहेत. यासह काही विकासाचे प्रकल्प असून ते पूर्ण करण्यासाठीच आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पुढील काळात खान्देशच्या विकासाचे नवे चित्र पहायला मिळेल.
चाळीसगाव येथे एका कार्यक्रमात माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आपण असे खेळाडू आहोत ते कुणाला टीममध्ये ठेवावे व कोणाला बाहेर काढावे ते ठरवतो, असे वक्तव्य केले होते. यासंदर्भात खडसे यांना विचारले असता त्यांनी सांगितले, त्यांच्या अशा बेजबाबदार खेळामुळे महाराष्ट्रात भाजपची सत्ता गेली. २०१४ ची निवडणूक भाजपने आपल्या नेतृत्वाखाली लढवली होती. त्यावेळी भाजपच्या १२३जागा जिंकून दाखवल्या होत्या. त्यावेळी राज्यात सत्ता नव्हती. केंद्रातील सत्ता येऊन केवळ तीन महिने झाले होते. पण २०१९ च्या निवडणुकीत राज्यात सत्ता होती, केंद्रातही भाजप मजबूतपणे सत्तेत असताना केवळ १०५ जागा मिळाल्या. टीम फडणवीसने ओबीसी नेत्यांना जाणीवपूर्वक डावलले व काहींचा पराभवही केला. त्यामुळे राज्यातील सत्ता गेली व आता विरोधी पक्षात बसण्याची वेळ आल्याचा आरोप खडसे यांनी केला.