मजुरीत वाढ नाही तर ऊसतोड नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 01:40 PM2020-09-26T13:40:35+5:302020-09-26T13:40:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : जोपर्यंत गुजरात राज्यातील साखर कारखाने ऊसतोड मजुरांना दिल्या जाणाऱ्या मजुरीत वाढ करीत नाही तोपर्यंत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : जोपर्यंत गुजरात राज्यातील साखर कारखाने ऊसतोड मजुरांना दिल्या जाणाऱ्या मजुरीत वाढ करीत नाही तोपर्यंत एकही मजूर ऊस तोड करण्यात जाणार नाही असे आव्हान आमदार सुरेश धस यांनी विसरवाडी व सोमावल, ता.तळोदा येथे आयोजित ऊस तोड मजूर मुकदम यांच्या या बैठकीत केले.
गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊस तोडणी मजूर, मुकादम व वाहतूकदार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ऊसतोड मजूर मुकादम व वाहतूकदार यांच्या हक्काच्या दरवाढ मागणी साठी पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात आमदार सुरेश धस हे चर्चासत्र घेत आहेत. नवापुर तालुक्यातील विसरवाडी व सोमावल येथील येथे ऊसतोड मजूर मुकादम यांची बैठक बोलावण्यात आली.
या चर्चासत्रात माजी मंत्री आमदार सुरेश धस, महाराष्ट्र श्रमिक ऊसतोड संघटनेचे अध्यक्ष विष्णुपंत जायभाय, माजी आमदार शरद गावित, नंदुरबार जिल्हा भाजपा चे सचिव संदीप अग्रवाल, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अतुल गावित, जि प सदस्य सुरेश सुरुपसिंग गावित, भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष जतन सिंग वसावे, माजी पंचायत समिती सभापती विनायक गावित रमेश गावित सुनील गावित आदी उपस्थित होते. सोमावल येथे पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे, नागेश पाडवी, प्रवीणसिंह राजपूत उपस्थित होते.
या चर्चासत्रात मार्गदर्शन करताना आमदार सुरेश धस म्हणाले की नवापूर तालुक्यातील ऊसतोड मजूर हे गुजरात राज्यातील साखर कारखान्यांसाठी गुजरात राज्यात जाऊन तिथे मजुरी करतात मात्र ऊसतोड मजुरांना मजुरी अत्यल्प मिळते. त्यामुळे त्यांच्या मुकादम यांना देखील कमिशन फारच कमी प्रमाणात मिळते, मुकादमांना मजुरांना देण्यासाठी पैसा खाजगी व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात घ्यावा लागतो त्यामुळे बहुतेक मुकादमांचे संसार उघड्यावर पडले आहे.ऊसतोड मजुरांची येथे संघटना नसल्याने त्यांचे संबंधित साखर कारखाने अन्याय करून शोषण करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार शरद गावित यांनी येथील ऊसतोड मजूर व मुकादम यांची संघटना नसल्याने व आपसात एकी नसल्याने संबंधित कारखाने लूट करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
चर्चासत्राचे सूत्रसंचालन माजी पंचायत समिती सभापती विनायक गावित यांनी केले तर आभार संदीप अग्रवाल यांनी मानले.
गुजरात राज्यातील साखर कारखाने मुकादमांना फार कमी प्रमाणात मजुरांना वाटप करण्यासाठी उचल देतात. त्यामुळे मुकादम यांना मजुरांना पैसा वाटप करण्यासाठी खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसा उचलावा लागतो व हाच पैसा पुढे मजुरांना दिडीच्या भावाने वाटप केला जाऊन नंतर वसूल केला जातो. त्यामुळे ऊसतोड मजुरांचे मोठ्या प्रमाणावर शोषण होत आहे. मजुरांना दिले जाणारी उचल ही कारखान्याकडून जास्त प्रमाणात मागणी करा व बिना व्याज मजुरांना वाटप करा. जोपर्यंत संबंधित कारखाने ऊसतोड मजुरांच्या मजुरीत वाढ करत नाही तोपर्यंत एकाही मुकादमाने यावेळी साखर कारखान्यात मजूर घेऊन जाऊ नये असे आवाहन यावेळी करण्यात आले.