दप्तरात चॉकलेट नको, सॅनिटायझर हवे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:34 IST2021-02-09T04:34:30+5:302021-02-09T04:34:30+5:30

नंदुरबार : कोरोनाने सर्वच ट्रेण्ड बदलून टाकले आहेत. विद्यार्थ्यांच्या शालेय दप्तरात शालेय साहित्यासोबत डबा, पाण्याची बाटली राहत होती. त्यात ...

No chocolate in the bag, just a sanitizer! | दप्तरात चॉकलेट नको, सॅनिटायझर हवे !

दप्तरात चॉकलेट नको, सॅनिटायझर हवे !

नंदुरबार : कोरोनाने सर्वच ट्रेण्ड बदलून टाकले आहेत. विद्यार्थ्यांच्या शालेय दप्तरात शालेय साहित्यासोबत डबा, पाण्याची बाटली राहत होती. त्यात आता भर पडली आहे ती सॅनिटायझर व मास्कची. शाळेत येताना सॅनिटायझर व मास्क सक्तीचा करण्यात आल्याने भले डबा राहिला तरी चालेल, परंतु सॅनिटायझर आणि मास्क विद्यार्थी आठवणीने घेत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील शाळा आता नियमित भरू लागल्या आहेत. विद्यार्थी उपस्थिती ५० टक्केच्या वर जाऊ लागली आहे.

पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. सुरुवातीला विद्यार्थी उपस्थिती २० टक्केच्या आत होती. परंतु नंतर आता त्यात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे शाळेत येताना मास्क व सॅनिटायझर सक्तीचे झाले आहे. त्यामुळे बाजारात विद्यार्थ्यांसाठी खास सॅनिटायझरची बाटली, मास्क विक्रीस आले आहेत. विद्यार्थ्यांकडून त्यांना मागणीदेखील चांगली आहे. फॅशनेबल मास्कलाही मागणी वाढल्याचे चित्र आहे.

एकही विद्यार्थी अद्याप बाधित नाही...

जिल्ह्यात उच्च माध्यमिक तसेच नववी व दहावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू झाले आहेत. तर २७ जानेवारीपासून माध्यमिकचे पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. इयत्ता पाचवी ते बारावीचे एकूण ५५ टक्केपर्यंत विद्यार्थी उपस्थित राहत आहेत, तर पाचवी ते आठवीचे जवळपास ४५ ते ५० टक्के विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. सर्व शाळांनी आवश्यक त्या उपाययोजना केलेल्या असून खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे आतापर्यंत एकही विद्यार्थी कोरोनाबाधित झालेला नाही. शाळांनीदेखील विविध माध्यमाने विद्यार्थी उपस्थिती वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही हा त्यामागील उद्देश आहे.

जिल्ह्यात शाळा यशस्वीपणे सुरू झाल्या आहेत. विद्यार्थी उपस्थितीदेखील वाढू लागली आहे. सुदैवाने एकही विद्यार्थी आतापर्यंत कोरोनाबाधित आढळून आलेला नाही. शिक्षक बाधिताचे प्रमाणदेखील अत्यल्प आहे. त्यामुळे पालकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून ते आपल्या पाल्यांना शाळेत पाठवू लागले आहेत. शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार सर्व शाळांनी आवश्यक त्या उपाययोजना केलेल्या आहेत. येत्या काळात उपस्थिती ७० टक्केपेक्षा अधिक जाईल या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. पालकांनीही निसंकोचपणे पाल्यांना शाळेत पाठवावे.

- एम.व्ही. कदम, माध्यमिक शिक्षणाधिकारी, नंदुरबार

Web Title: No chocolate in the bag, just a sanitizer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.