ना जि.प.ची निवडणूक ना केंद्रात मंत्रीपद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:21 IST2021-07-11T04:21:34+5:302021-07-11T04:21:34+5:30
नंदुरबार : जिल्ह्याच्या राजकारणात गेला आठवडा सर्वात जास्त राजकीय घडामोडीचा राहिला. कारण जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची सुरू ...

ना जि.प.ची निवडणूक ना केंद्रात मंत्रीपद !
नंदुरबार : जिल्ह्याच्या राजकारणात गेला आठवडा सर्वात जास्त राजकीय घडामोडीचा राहिला. कारण जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची सुरू असलेली तयारी आणि त्यातच केंद्रात खासदार डॉ.हीना गावीत यांना मंत्रीपद मिळण्याची चर्चा जोरात होती. त्यामुळे साहजिकच कार्यकर्त्यांमध्ये त्यासंदर्भातील प्रचंड उत्सुकता होती. पण जि.प.ची पोटनिवडणूकही कोरोनामुळे स्थगित झाली आणि केंद्रातील मंत्रीपदही हुकले. त्यामुळे उत्साह शिगेला पोहोचलेल्या कार्यकर्त्यांचा मात्र हिरमोडच झाला.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन जिल्हा परिषदेतील रद्द करण्यात आलेले ११ जि.प. सदस्यांचे सदस्यपद व १४ पंचायत समिती सदस्यांचे सदस्यपद रद्द झाले होते. त्यासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. यासंदर्भात राज्य शासनानेच निवडणूक पुढे ढकलण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने सुरुवातीला ही निवडणूक होणार नाही या अपेक्षेने सर्वच राजकीय पक्षात शांतता होती. मात्र न्यायालयात सुनावणीसाठी दोन तारखा मिळताच सर्वच राजकीय पक्ष गेल्या आठवड्यात खळबळून जागे झाले आणि उमेदवार देण्यासाठी राजकीय डावपेच रंगले. त्यामुळे या निवडणुकीसाठी गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी घडल्या. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राम चंद्रकांत रघुवंशी यांचेही सदस्यपद रद्द झाले होते. त्यांनी निवडणुकीसाठी पुन्हा अर्ज भरला होता. तर भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या कन्या व खासदार डॉ.हीना गावीत यांच्या लहान भगिनी डॉ.सुप्रिया गावीत यांचाही निवडणुकीत अनपेक्षितपणे उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने सर्वच राजकीय पक्षांचा भुवया उंचावल्या होत्या. तर जि.प.चे माजी सभापती अभिजित पाटील यांनी उमेदवारी अर्जच भरला नाही. त्यांच्याजागी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी हेमलता शितोळे यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्याने या घडामोडीही जिल्ह्यातील राजकारणात चर्चेच्या ठरल्या. या सर्व घडामोडी घडत असताना निवडणूक आयोगाने निवडणुकीला स्थगिती दिल्याने सर्वच राजकीय हालचाली थांबल्या.
दुसरीकडे या घडामोडी घडत असताना केंद्रात खासदार डॉ.हीना गावीत यांना मंत्रीपद मिळण्याची चर्चा सुरू झाली. राष्ट्रीय वाहिन्यांवरून त्याबाबतचे वृत्त सुरू झाल्याने डॉ.विजयकुमार गावीत समर्थकांमध्ये एकच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रत्यक्षात मंत्रीपद दुसरीचकडे गेल्याने मंत्रीपद का हुकले याची नव्याने चर्चा सुरू झाली. महाराष्ट्रातील ज्यांना मंत्रीपद मिळाले ते सर्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गटातील होते. डॉ.हीना गावीत या दुसऱ्यांदा खासदार म्हणून विजयी झाल्या आहेत. त्यांचा पहिल्यांदा भाजपमधील प्रवेश हा थेट दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीतच झाला होता. त्या खासदार म्हणून विजयी झाल्यानंतर आपल्या वक्तृत्वाने आणि अभ्यासाने त्यांनी संसदेत व दिल्लीत छाप उमटवली. त्यामुळे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्तेपदही त्यांना मिळाले. गेल्या निवडणुकीत स्थानिक व राज्यातील पक्षातील एका गटाच्या विरोध असतानाही त्यांना उमेदवारी मिळाली होती. त्या दुसऱ्यांदा विजयी झाल्या पण पक्षातील गटातटातील राजकारण मात्र संपलेले नसल्याचे चित्र आहे. त्यातूनच त्यांचे मंत्रीपद हुकल्याची चर्चा आहे. अर्थात चर्चा काहीही असली तरी निवडणुकीला स्थगिती आणि मंत्रीपद हुकल्याने राजकारणातील उत्साहाचे वातावरण सध्या तरी शांत झाले आहे.