मांडवी परिसरात मोबाइल टॉवर उभारण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST2021-05-29T04:23:24+5:302021-05-29T04:23:24+5:30
डिजिटल इंडिया म्हणवणाऱ्या भारतातील ग्रामीण भागात अद्यापदेखील अनेक खेडे गावात मोबाइल नेटवर्क नाही. धडगाव तालुक्यातील अनेक गावांना तर अजून ...

मांडवी परिसरात मोबाइल टॉवर उभारण्याची गरज
डिजिटल इंडिया म्हणवणाऱ्या भारतातील ग्रामीण भागात अद्यापदेखील अनेक खेडे गावात मोबाइल नेटवर्क नाही. धडगाव तालुक्यातील अनेक गावांना तर अजून मोबाइल नेटवर्क मिळत नाही तर डिजिटल केव्हा होणार. तालुक्यातील मांडवी परिसरात मोबाइल टॉवर नसल्याने नेटवर्कअभावी अनेक विद्यार्थी हे ऑनलाइन शिक्षणापासून वंचित आहे. विद्यापीठाच्या परीक्षादेखील ऑनलाइन चालू असल्याने मांडवी परिसरातील विद्यार्थ्यांना अनेकवेळा ऑनलाइन परीक्षेला मुकावे लागत आहे. नेटवर्क नसल्याने ग्रामपंचायतीचे ऑनलाइन कामे, मांडवी आश्रमशाळेतील कामे व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अनेक कामात खंड पडत आहे. यामुळे परिसरातील ग्रामस्थ नाराज आहे.
मांडवी ग्रामपंचायत ही ११ गावाची ग्रुप ग्रामपंचायत आहे. यात बऱ्याच गावात मोबाइल नेटवर्क नाही, गावात सेंट्रल बँक ऑफ इंडियाची शाखादेखील आहे. मात्र अद्याप ही गावात मोबाइल टॉवर नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. मांडवी येथे टॉवर उभारण्याची मागणीसाठी ग्रामस्थांकडून वेळोवेळी लोकप्रतिनिधी आणि शासन दरबारी ई-मेल द्वारे अर्ज पाठवून व निवेदनाद्वारे केली जात आहे. मात्र याकडे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप मांडवी व परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
गावात सन २०१७ साली खासगी कंपनीकडून टॉवर बांधण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. परंतु मांडवी व परिसरातील अनेक गावे वनविभागात येत असल्याने ते काम वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी थांबवले. यावर प्रशासनाने तोडगा काढून नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता लवकरच मोबाइल टॉवरचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
मांडवी व परिसरातील नागरिकांकडून येथे बंद झालेल्या खासगी कंपनीच्या टॉवरचे काम पुन्हा चालू करण्यात यावे किंवा भारत दूरसंचार निगम या सरकारी कंपनीचे टॉवर उभारण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.