अतिदुर्गम भागात बारमाही रस्त्यांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 12:32 IST2020-03-17T12:32:49+5:302020-03-17T12:32:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : अक्कलकुवा तालुक्यातील होराफळीसह परिसरातील गावांना जोडण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा ...

अतिदुर्गम भागात बारमाही रस्त्यांची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : अक्कलकुवा तालुक्यातील होराफळीसह परिसरातील गावांना जोडण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या भागांना जोडणाऱ्या बारमाही रस्त्यांची निर्मिती व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील होराफळी, निंबापाटी, वालांबा, बेअटी, खडकापाणी, ठाणा, टोकणापिंप्री, मोरखी हा सातपुड्यातील गुजरात राज्याच्या सीमेला लागून असणारा अतिदुर्गम भाग आहे. या भागात पोहचण्यासाठी खापरहून मोरांबा, कुंडीमार्गे रस्ता आहे. कुंडीपासून तर होराफळीपर्यंतचा रस्ता हा घाटमार्ग असून या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी पक्का रस्ताच अस्तित्वात नाही. कच्या रस्त्यावर दगड-मातीमुळे मोठ्या प्रमाणात उंचसखलपणा निर्माण झाला आहे.
रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे या मार्गावर अवलंबून असणारी वाहतूक सुविधा पूर्णपणे बंद झाली आहे. केवळ दुचाकीधारक व ट्रक, टेम्पो यासारखी मोठी वाहने जीवघेणी कसरत करीत या मार्गावरून ये-जा करीत असतात. रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे कोणत्याही प्रकारची सार्वजनिक वाहतूक सुविधा या भागात उपलब्ध नाही. रत्याची दुरवस्था व सार्वजनिक वाहतूक सुविधेचा अभाव यामुळे या परिसरातील नागरिकांना आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात पायपीटच करावी लागत असल्याचा अनुभव आहे.
कुंडी ते होराफळी हा अवघ्या सहा ते सात किलोमीटर अंतराचा रस्ता आहे. काही वर्षांपूर्वी कुंडी ते होराफळीला जोडणारा पक्का रस्ता तयार करण्यात आला होता. होरफळीपासून कुंडीकडे येतांना तीव्र उताराच्या रत्यावर पावसाळ्यात दरडी कोसळत असल्याने दरडी कोसळणाºया भागातील रस्ता पूर्णपणे नामशेष झाला आहे. पावसाळ्यात दरड कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. त्यामुळे या भागांतील नागरिकांना होराफळी गाठण्यासाठी शेलांबा, देवमोगरा मार्गे तब्बल ५० किलोमीटर अंतराचा फेरा मारून यावे लागते. सध्याच्या परिस्थितीतदेखील या भागात येणारी लहान चारचाकी वाहने याच परिसरात दाखल होऊ शकता.
दरम्यान, रत्याअभावी या परिसरातील दळणवळणाच्या सोयीसुविधेची वाणवा असून, या परिसरातील अनेक गावात स्वातंत्र्यानंतरच्या ७२ वर्षातदेखील बस पोहचू शकलेली नाही. खाजगी प्रवासी वाहतूक हा या भागातील नागरिकांसाठी दळणवळणाचा एकमेव पर्याय आहे. रस्त्याचाअभाव व दळणवळणाच्या साधनांची अनुपलब्धता ही या भागाच्या विकासासाठी मोठी अडचण असून, या भागाला तालुका मुख्यालयाला जोडणारा बारमाही रस्तानिर्माण करावा अशी, मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
सातपुड्याच्या अतिदुर्गम भाग महाराष्ट्र व गुजरात हद्दीला लागून आहे. एकीकडे महाराष्ट्र सरकार या भागात रस्त्याचे जाळे निर्माण करण्यात मागे पडलेले असतांना गुजरात सरकारने मात्र या भागात मजबूत व दुपदरी रस्ते निर्माण केले आहेत. होराफळीपासून अवघ्या तीन किमी अंतरावर देडियापाड्यापासून माल या गुजरात राज्याच्या शेवटच्या गावापर्यंत गुजरात सरकारने पक्का दुपदरी रस्ता निर्माण केला आहे. अतिदुर्गम भागातील वडफळी, होराफळी, निंबापाटी, टोकणापिंप्री, मोरखी यासारख्या महाराष्ट्र हद्दीत अनेक गावाला पोहचण्यासाठी गुजरात हद्दीत या चकचकीत मार्गावरून मार्गक्रमण करावे लागते. गुजरात सरकार जर सातपुड्याच्या एवढ्या अतिदुर्गम भागात मजबूत दुपदरी रस्त्याचे जाळे निर्माण करू शकते तर महाराष्ट्र सरकार का करू शकत नाही, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.