बोगस बियाणे विक्रेत्यांचे पाळेमुळे खणण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:31 IST2021-05-19T04:31:37+5:302021-05-19T04:31:37+5:30
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ मे रोजी कृषी विभागाच्या पथकाने कोठली, ता. शहादा येथे एका ...

बोगस बियाणे विक्रेत्यांचे पाळेमुळे खणण्याची गरज
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ मे रोजी कृषी विभागाच्या पथकाने कोठली, ता. शहादा येथे एका घरावर छापा टाकून अंदाजित एक लाख रुपये किमतीचे एचटीबीटी बियाणे जप्त केले. यंदाच्या खरीप हंगामाची ही पहिलीच कारवाई आहे. पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत असले तरी तालुक्यात अजूनही मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बियाणे असल्याची चर्चा सुरू आहे. त्याचा शोध पथकाने घ्यावा व कारवाई करून अनधिकृत बियाणे लागवडीपासून सर्वसाधारण शेतकऱ्यांना वाचवावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.
तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बियाणे विक्री होते हे सर्वश्रुत आहे. कमी दरात विक्री होत असल्याने सहाजिकच शेतकऱ्यांना हे बियाणे घेण्याचे आमिष कथित अनधिकृत विक्रेत्यांकडून केले जाते. शेतकरी या आमिषाला बळी पडून लागवड करतात. कृषी विभागाने निदान गावोगावी या बियाण्यांविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे. अन्यथा अनधिकृत बियाणे लागवड करून शेतकऱ्यांना उत्पादनात मोठी झळ सोसावी लागेल. आधीच लॉकडाऊन तसेच तत्सम बाबींमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
लॉकडाऊन तरीही बियाणे?
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी किरकोळ विक्रेता ते शेतकरी १ जूनपासून बियाणे विक्रीचे निर्देशित केले आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने बऱ्याच अवैध व्यवसायांना लगाम लागला आहे; परंतु परराज्यातून एवढा मोठा बियाणाचा साठा दरवर्षी तालुक्यात येतोच कसा? यात नेमका आशीर्वाद कोणाचा याचाही शोध घेणे गरजेचे आहे. दरवर्षी कृषी विभाग माहिती मिळाल्यानंतर छापा टाकून मुद्देमाल जप्त करीत संबंधितांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर सोपस्कार तर होतोच; परंतु अनधिकृत बियाणे विक्रेत्यांची मोठी साखळी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांचा शोध घेऊन पाळेमुळे खणण्याची गरज आहे, अन्यथा शेतकरी अनधिकृत व बोगस बियाणे विक्रेत्यांच्या आमिषाने पुरता देशोधडीला लागेल, यात शंका नाही.