नवापूर : रेशनसाठी आधार लिंक बंधनकारक; अन्यथा १० फेब्रुवारीपासून अन्नधान्य मिळणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST2021-02-05T08:07:38+5:302021-02-05T08:07:38+5:30
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक आणि आधार लिंक पूर्ण करण्याच्या केंद्र सरकारच्या ...

नवापूर : रेशनसाठी आधार लिंक बंधनकारक; अन्यथा १० फेब्रुवारीपासून अन्नधान्य मिळणार नाही
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक आणि आधार लिंक पूर्ण करण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना आहेत.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी मोहीम राबवून लाभार्थ्यांचे आधार, मोबाईल लिंक करणे आवश्यक आहे. याकरिता रेशन दुकानांतील ई-पॉस उपकरणांमधील ईकेवायसी व मोबाईल लिंकिंग सुविधेचा वापर करून आधार व मोबाईल क्रमांक लिंकचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. याकरिता १० फेब्रुवारी प्रत्येक रेशनकार्डमधील लाभार्थ्यांचे शंभर टक्के आधार लिंकिंग आणि किमान एक मोबाईल क्रमांक देण्याच्या उद्दिष्टाने नवापूर तालुक्यात मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने धान्याचे मासिक वाटप करतेवेळी ई-पॉस उपकरणाद्वारे रास्त भाव दुकानदारांमार्फत शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांचा आधार व मोबाईल क्रमांक लिंक करण्यात येणार आहे. याबाबत आधार लिंक न झालेल्या लाभार्थ्यांची दुकाननिहाय यादी तयार करण्यात आली आहे. १० फेब्रुवारी पूर्वी या लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल क्रमांक लिंक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नवापूर तालुक्यातील एकूण ६२ हजार रेशन कार्डधारक आहेत त्यातून ३८ हजार २१५ कार्डधारकांनी आधार लिंकिंग करणे बाकी आहे. रेशनकार्डधारकांनी ११ दिवसाच्या मुदतीत आधारकार्ड लिंकिंग करणे गरजेचे आहे. रविवारीदेखील रेशनकार्ड रेशन दुकानात लिंकिंग केले जाणार आहे.
केवायसी पडताळणी व मोबाईल लिंक सुविधा प्रत्येक रास्त भाव धान्य दुकानात आणि संबंधित परिमंडळ कार्यालयात उपलब्ध आहे.
रेशनकार्ड धारकांसाठी
रेशनकार्डमध्ये नोंद असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड घेऊन संबंधित रास्त भाव धान्य दुकानात जाऊन केवायसी पडताळणी करावी
संबंधित लाभार्थींनी वैयक्तिकरीत्या दुकानात जाऊन आधारकार्ड व अंगठ्याचा ठसा ई-पॉस मशीनवर द्यावयाचा आहे.
कुटुंबातील किमान एका सदस्याचा मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे. यातून रेशनकार्डमधील भ्रष्टाचाराला लगाम लागणार आहे.