बाल वैज्ञानिक घडविणारी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:58 IST2021-02-28T04:58:59+5:302021-02-28T04:58:59+5:30
नंदुरबार : बाल वैज्ञानिकांना घडविण्याचे काम नंदुरबार येथील बाल विज्ञान परिषद करीत आहे. या परिषदेच्या माध्यमातून आतापर्यंत १० वैज्ञानिक ...

बाल वैज्ञानिक घडविणारी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद
नंदुरबार : बाल वैज्ञानिकांना घडविण्याचे काम नंदुरबार येथील बाल विज्ञान परिषद करीत आहे. या परिषदेच्या माध्यमातून आतापर्यंत १० वैज्ञानिक प्रकल्प हे राज्य स्तरावर तर दोन प्रकल्प हे राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचले आहेत. कोरोनाकाळात देखील या परिषदेने आपले कार्य सुरू ठेवून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयी जाणीव-जागृती कायम ठेवली.
मुलांच्या शास्त्रीय संशोधन वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी भारत सरकाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेची स्थापना केली आहे. नंदुरबार जिल्ह्यात या परिषदेचे कार्य गेल्या १० ते १५ वर्षांपासून सुरू आहे. कुठलाही गाजावाजा न करता आपले काम सुरू ठेवत बाल वैज्ञानिक घडविण्याचे राष्ट्रीय कार्य या परिषदेमार्फत सुरू आहे.
काय आहे उद्देश
१० ते १७ वयोगटातील मुलांच्या शास्त्रीय संशोधन वृत्तीला प्रोत्साहन देणे व त्यांच्या मुक्त कल्पना शक्तीला वाव देणे हे बाल विज्ञान परिषदेचे ध्येय आहे. मुलांनी त्यांच्या दैनंदिन घडामोडींचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करावा, दिलेल्या विषयावर एखादी समस्या निश्चित करून निरीक्षण करून माहिती संकलित करावी. विश्लेषण करून अनुमान काढावे व उपाययोजना सांगाव्या. लघु संशोधनात्मक प्रकल्प सादर करावा हा उद्देश या परिषदेचा आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील काम
जिल्ह्यात या परिषदेचे कामकाज १० ते १५ वर्षांपासून सुरू आहे. जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाच्या सहकार्याने माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम, शिक्षण उपनिरीक्षक आर.बी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी.आर.विद्यालयाचे शिक्षक पंकज पाठक, एकलव्य विद्यालयाचे शिक्षक मिलिंद वडनगरे व श्रीराम क्लासेसचे आशिष वाणी हे या परिषदेचे काम पाहतात. यंदापासून वात्सल्य सेवा समितीला जिल्हा समन्वयक म्हणून नेमण्यात आले आहे.
विज्ञान प्रकल्पांची झेप...
परिषदेतर्फे दरवर्षी राज्यस्तरीय परिषदेसाठी प्रकल्पांची निवड केली जाते. आतापर्यंत १० प्रकल्प राज्य तर दोन प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर गाजले आहेत. जिल्ह्यातून पीएचडी धारक प्राध्यापक, कृषी विज्ञान केंद्राचे वैज्ञानिक व कृषी विभागाचे अधिकारी यांची परीक्षक म्हणून नेमणूक करण्यात येते. काटेकोरपणे परीक्षण करून राज्यस्तरीय प्रकल्पांची निवड केली जात असते.
कोरोना काळातही स्पर्धा
वात्सल्य सेवा समितीने यंदा या परिषदेच्या माध्यमातून कोरोना काळातही काम केले. ॲानलाइन वैज्ञानिक प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. २१ प्रकल्प व विद्यार्थी त्यात सहभागी झाले होते. त्यातील चार प्रकल्प राज्यस्तरीय परिषदेसाठी निवडले गेले. त्यापैकी तीन प्रकल्प खासगी कोचिंग क्लासेसचे तर एक प्रकल्प वैंदाणे, ता.नंदुरबार शाळेचा होता. त्यातील प्रणव वडाळकर याचा ‘सोलर ॲापरेटेड मल्टीपर्पज पॅावर बॅंक’ या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावरील परिषदेसाठी निवड झाली आहे. याशिवाय २०१३ साली ‘सोलर ट्रॅकिंग सिस्टिम’ या प्रकल्पानंतर राष्ट्रीय स्तरावर जाणारा हा दुसरा प्रकल्प ठरला आहे.
याशिवाय परिषदेअंतर्गत वात्सल्य सेवा समितीमार्फत विज्ञान व पर्यावरण जनजागृतीचे विविध उपक्रम जिल्हाभरात राबविले जातात. विज्ञान-पर्यावरण विषयक कै.बाळासाहेब पाठक व्याख्यानमालेतून आतापर्यंत अणुशास्त्रज्ञ डॅा.अनिल काकोडकर, पर्यावरणतज्ज्ञ डॅा. दिलीप कुलकर्णी, डी.आर.ओ.पुणेचे शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर आदी येऊन गेले आहेत. आगामी काळात आदिवासी भागात विज्ञान आपल्या दारी या योजनेअंतर्गत फिरती प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार असून ‘शनिवारी विज्ञान वारी’ यासारखे उपक्रमही राबविण्यात येणार आहे.