नंदुरबार तालुक्यात पाऊस व गारपीटमुळे पावणे दोनशे हेक्टरवर पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST2021-03-25T04:28:53+5:302021-03-25T04:28:53+5:30
नंदुरबार : अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे नंदुरबार तालुक्यात १७४ हेक्टरपेक्षा अधीक क्षेत्रात नुकसान झाले आहे. प्राथमिक स्तरावर पंचनामे करण्यात ...

नंदुरबार तालुक्यात पाऊस व गारपीटमुळे पावणे दोनशे हेक्टरवर पिकांचे नुकसान
नंदुरबार : अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे नंदुरबार तालुक्यात १७४ हेक्टरपेक्षा अधीक क्षेत्रात नुकसान झाले आहे. प्राथमिक स्तरावर पंचनामे करण्यात आले आहेत. दरम्यान आमदार डॅा.विजयकुमार गावीत यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली व शेतकऱ्यांना दिलासा दिला.
जिल्ह्यात गेल्या चार दिवसात अवकाळी पाऊस व काही भागात झालेल्या गारपीटमुळे शेतशिवाराचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, पपई, केळी, टरबूज या पिकांना फटका बसला आहे. नंदुरबारसह शहादा व तळोदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्राथमिक पंचनाम्यात साधारणत: ३०० हेक्टपर्यंत नुकसानीचा अंदाज आहे. त्यात काही भागात कमी अधीक नुकसानीचा समावेश आहे.
नंदुरबार तालुक्यात प्राथमिक पंचनाम्यात एकुण १७४.५७ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यामध्ये गहू १२.४५हेक्टर, पपई ८४.५१ हेक्टर, केळी ४९.९३ हेक्टर, मका ५.१८ हेक्टर, ज्वारी सहा हेक्टर, टोमॅटो दोन हेक्टर, हरभरा ४.५० हेक्टर, टरबूज पाच हेक्टर, मिरची पाच हेक्टर अशा क्षेत्रात नुकसान झाले आहे.
बुधवारी आमदार डॅा.विजयकुमार गावीत यांनी नंदुरबार तालुक्यातील कानळदे, बोराळे, काकर्दे, नाशिंदे, विखरण, सुजालपूर आदी परिसरातील नुकसानीची पहाणी केली.
यावेळी पंचायत समिती सभापती प्रकाश गावीत, भाजप तालुकाध्यक्ष दीपक पाटील, शेखर पाटील, शांताराम पाटील, आर.डी.वळवी, विजय मोहिते, करणसिंग गिरासे, एम.एस.लाड, राजेंद्र गिरासे, मनोज पंदाणे, नायब तहसीलदार भिमराव बोरसे आदी उपस्थित होते. दिवसभर कृषी विभागाचे अधिकारी पंचनाम्याच्या कामात व्यस्त असल्याचे गटविकास अधिकारी अशोक पटाईत यांनी सांगितले.
आमदार डॅा.गावीत यांनी अधिकाऱ्यांना विविध सुचना दिल्या.