अत्याधुनिक सौरऊर्जा प्रकल्प राबविणारी नंदुरबार खान्देशातील पहिली पालिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:29 IST2021-04-18T04:29:56+5:302021-04-18T04:29:56+5:30
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. सौरऊर्जा प्रकल्प एवढ्या मोठ्या ...

अत्याधुनिक सौरऊर्जा प्रकल्प राबविणारी नंदुरबार खान्देशातील पहिली पालिका
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. सौरऊर्जा प्रकल्प एवढ्या मोठ्या प्रमाणावर राबविणारी नंदुरबार नगर परिषद महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका ठरली आहे. या प्रकल्पास महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत निधी मिळालेला असून, ९३९ किलोवॅटचा हा प्रकल्प सुरू झाल्यापासून नंदुरबार नगर परिषदेची ऊर्जा बचतीसह आर्थिक बचत मागील तीन महिन्यांपासून होत आहे. हा प्रकल्प एकूण दहा साईट्सवर लावण्यात आलेला असून, झराळी वॉटर पंपिंग स्टेशन, झराळी वॉटर फिल्टर प्लांट, एस.टी.पी. प्लांट नळवा आणि इतर ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत. सध्या प्रकल्पामधून तयार होणाऱ्या विजेतून महिन्याला सहा ते सात लाख रुपयांची बचत होत आहे. उर्वरित ठिकाणी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने लवकरात लवकर परवानगी दिल्यास या बचतीमुळे येणाऱ्या पाच ते सहा वर्षांत प्रकल्प किंमत संपूर्णपणे वसूल होणार आहे. या प्रकल्पामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे मोनो क्रिस्टलाईन सौरऊर्जा पॅनल लावण्यात आलेले आहेत. मोनो क्रिस्टलाईन सौरऊर्जा पॅनल देशात पहिल्यांदाच सरकारी प्रकल्पामध्ये वापरण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे एबीबी आणि फ्रॉनीयस या युरोपियन कंपन्यांचे इन्व्हर्टर वापरलेले आहेत. तसेच डीसी केबलिंग करताना फ्रॉगलिप आणि ऑप्टीमाईस्ड स्ट्रिंगिंग तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. या प्रकल्पात वापरण्यात आलेल्या आराखड्याचे स्टॅड विश्लेषण करण्यात आलेले आहे. अशा प्रकारे सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट डिझाईन याची सांगड या प्रकल्पाच्या माध्यमातून नंदुरबार नगर परिषदेने घातली आहे व त्याचा परिणाम आतापर्यंत झालेल्या चांगल्या वीज उत्पादनातून दिसून येत आहे. या प्रकल्पातून नियमित वीज उत्पादन व्हावे यासाठी देखाभाल दुरुस्ती सुद्धा नगर परिषदेमार्फत करण्यात येत आहे. हा प्रकल्प अभूतपूर्व डिझाईनमुळे तंत्रशिक्षणातील तरुण विद्यार्थी, शिक्षक, उद्योजक, नागरिक यांना मार्गदर्शक ठरणार आहे. लॉकडाऊनमध्येही अत्यावश्यक सेवांमध्ये या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले. नंदुरबार नगरपालिकेची पुढील २५ वर्षे वीजबचत तर होणार आहे.