माझे कुटुंब माझी जबाबदारी याबाबत विभागीय आयुक्तांची नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:24 IST2021-05-03T04:24:49+5:302021-05-03T04:24:49+5:30
तळोदा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान शहादा शहराबरोबरच तळोदा शहर व ग्रामीण भागात अत्यंत उदासीनतेने ...

माझे कुटुंब माझी जबाबदारी याबाबत विभागीय आयुक्तांची नाराजी
तळोदा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान शहादा शहराबरोबरच तळोदा शहर व ग्रामीण भागात अत्यंत उदासीनतेने चालू असून संशयित आढळलेल्या ३६१ रुग्णांपैकी केवळ २० जणांचे स्वॅब घेण्यात आले आहे. साहजिकच, येथील यंत्रणेच्या कामाबाबत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून जिल्हा परिषद प्रशासनास दखल घेण्याचे पत्रात सूचित केले आहे.
कोरोना महामारीने दिवसेंदिवस अक्षरशः उग्र स्वरूप धारण केले आहे. परिणामी, संपूर्ण राज्यात रुग्णवाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. परिणामी, शासनानेदेखील लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लावले आहे. त्याउपरही रुग्णसंख्या आवाक्यात येत नसल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान राबविण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाला यश आले होते. साहजिकच, शासनाने २९ तारखेपासून पुन्हा हे अभियान सुरू केले आहे. गुरुवारपासून संपूर्ण आठवडाभर अभियान शहराबरोबरच ग्रामीण भागात सुरू झाले आहे. या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाची आरोग्याची माहिती घेतली जात आहे. प्राथमिक, माध्यमिक, अंगणवाडीसेविका, आशा कार्यकर्त्या आशा कर्मचारी यांच्यामार्फत कुटुंबांचे सर्वेक्षण केले जात आहे. यात प्रत्येकाचे तापमान, ऑक्सिजन, इतर लक्षणे अशी माहिती घेतली जात आहे. तथापि, हे अभियान सुरू करून तीन दिवस झाले. तरीही शहादा, तळोदा शहरांबरोबरच ग्रामीण भागात अत्यंत संथगतीने सुरू आहे. तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना अभियानाचे गांभीर्य नसल्याचे पत्रात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गेम यांनी नमूद केले आहे. एवढेच नव्हे या सर्वेक्षणात ३६१ कोरोना संशयित आढळून आले आहेत. त्यांच्यापैकी केवळ २० जणांचे स्वॅब टेस्टिंग केल्याचा ठपका पत्रात ठेवला आहे. वास्तविक, या सर्वेक्षणातून कोरोना संशयित रुग्ण निश्चितच समोर येतील. त्यामुळेच शासनाने पुन्हा अभियान सुरू केले आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्यामुळे अभियानाचा हेतू सफल होत नाही. त्यामुळे संबंधित प्रशासनाने गांभीर्याने घेऊन कर्मचाऱ्यांना सूचना द्याव्यात, अशी सूचना मांडली आहे. दरम्यान, शेजारच्या धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पारोळा, सावदा, जामनेर ग्रामीण येथे तसेच चित्र आहे. २,५६० संशयितांपैकी ६६० जणांची कोरोना चाचणी घेण्यात आलेली नाही. धुळ्याठी ४७८ संशयितांपैकी एकाचीही स्वॅब टेस्टिंग करण्यात आली नसल्याचे म्हटले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करून तसा अहवाल पाठवण्याची सूचना देण्यात आली आहे.
ग्रामीण भागात कुटुंबांचे असहकार्य
शासनाने कोरोना महामारीचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण व माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान राबविण्याचे निर्देश दिले असले, तरी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कुटुंबे सर्वेक्षणास सहकार्य करत नसल्याचे चित्र आहे. आधीच लसीकरणाच्या अफवांमुळे लसीकरणाविषयी प्रचंड दहशत आहे. सर्वेक्षण व जनजागृती करणारे कर्मचारी त्यांचे प्रबोधन करतात, मात्र अशिक्षितपणामुळे ते ऐकायला तयार नसतात. अशा घटनांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. निदान, वरिष्ठ अधिकारी यांनीदेखील स्वतः गावकऱ्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.