तळोद्यात ३५ दुकानांना पालिकेतर्फे सील; व्यावसायिकांमध्ये खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:13 IST2021-05-04T04:13:34+5:302021-05-04T04:13:34+5:30
सध्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे बाधितांची संख्यादेखील प्रचंड वाढत आहे. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी ...

तळोद्यात ३५ दुकानांना पालिकेतर्फे सील; व्यावसायिकांमध्ये खळबळ
सध्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे बाधितांची संख्यादेखील प्रचंड वाढत आहे. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून उपाय योजना केल्या जात आहेत. शहरातील गर्दी थोपविण्यासाठी गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने तळोदा नगरपालिकेने शहरातील मेडिकल, कृषी प्रतिष्ठाने, शासकीय कार्यालय, दूध डेअरी, दवाखाने, किराणा दुकाने, भाजीपाला व मांस विक्रेते वगळता इतर सर्व व्यावसायिकांना या कालावधीत दुकाने बंद ठेवण्याची सूचना दिली आहे. प्रत्यक्ष दवंडीनेसुद्धा व्यापाऱ्यांना अवगत केले आहे. या उपरांतही अनेक दुकानदार आतून दूकान सर्रास चालू ठेवत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. साहजिकच प्रशासनाने अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मोहीम सोमवारी सुरू केली. पालिकेच्या पथकाने मेन रोडवरील अशी ३५ दुकाने सील केल्याची कारवाई केली आहे. साहजिकच यामुळे व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. सील केलेली दुकाने लॉकडाऊन उठेपर्यंत उघडण्याचा प्रयत्न केला तर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. ही कारवाई पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र माळी, मोहन माळी, दिगंबर सूर्यवंशी, नारायण चौधरी, जगदीश सागर, अनिल माळी, सुनील माळी यांच्या पथकाने केली. यावेळी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
सोमवारी शहरात तोबा गर्दी
शनिवार व रविवारी जनता कर्फ्यु होता. त्यामुळे १४४ कलम लागू असताना सोमवारी ग्रामीण भागातील नागरिकांनी तळोदा शहरात तोबा गर्दी केल्याचे चित्र होते. बँका, दुकानांमध्ये ग्राहकांच्या गर्दीने सामाजिक दुरीचा अक्षरशः फज्जा उडाला होता. वास्तविक व्यावसायिकांनादेखील गर्दीबाबत सूचना दिल्या आहेत. तरीही त्याचे पालन होत नसल्याचे दिसून येते. प्रशासन अन् पोलिसांकडून नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यामुळे दुकानदारांचे फावले असल्याचा आरोप आहे. अशीच जर शहरात गर्दी होत असेल तर कोरोनावर मात कशी करता येईल, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यासाठी महसूल, पालिका व पोलीस या तिन्ही यंत्रणांनी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे; परंतु एकमेकांवर जबाबदारी झटकत असल्याचे सांगितले जात आहे.
शहरातील काही व्यावसायिक बाहेरून शटर व दरवाजे लावून आत ग्राहकांना बोलवून गर्दी जमा करतात. साहजिकच अशा छुप्प्या व्यवसायामुळे गर्दी होत असते. शासनाच्या लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत दुकानदारांना सूचना दिल्या आहेत. तरीही त्याचे उल्लंघन करून दुकानदार गर्दी जमवतात. त्यामुळे सोमवारी अशा दुकानांवर सीलची कारवाई करण्यात आली. लॉकडाऊनचे बंधन असेपर्यंत दुकाने उघडू नये, अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. -राजेंद्र माळी, कार्यालयीन अधीक्षक, नगरपालिका तळोदा.