मुंबईची एसटी झाली रिकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:30 IST2021-03-26T04:30:13+5:302021-03-26T04:30:13+5:30
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या निर्णयाची ...

मुंबईची एसटी झाली रिकामी
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. यासाठी नंदुरबार आगारातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसेस या शुक्रवारपासूनच थांबणार असल्याने मुंबईच्या एसटीचे रिझर्व्हेशन थांबले आहे. दरम्यान, दुसरीकडे कोरोनामुळे मुंबईकडे जाणारे प्रवासी कमी झाले असल्याने या बसेसही रिकाम्या धावत आहेत.
नंदुरबार बसस्थानकातून सकाळी व सायंकाळी अशा दोन बसेस मुंबई महानगरासाठी नियमित चालवण्यात येतात. प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या या बसेसला प्रतिसाद असतो. परंतु कोरोना संसर्ग वाढत असल्याने नागरिक प्रवास करणे टाळत असल्याने या बसेस सध्या रिकाम्या धावत असल्याचे चित्र आहे. यातून गाड्यांना रिझर्व्हेशनही नसल्याची माहिती देण्यात आली आहे. नाशिक येथूनही बसला रिझर्व्हेशन नसल्याची माहिती आहे. दरम्यान, शनिवार आणि रविवारच्या बंदमध्ये एसटी सहभागी होणार असल्याने आठवड्यातून केवळ पाचच दिवस या बसेस सुरू राहणार असल्याने महामंडळाचे नुकसान वाढणार आहे.
नंदुरबार आगारातून दिवसभरात ५२२ फेऱ्या
नंदुरबारात आगारातून सध्या ग्रामीण व शहरी भागासाठी एकूण ५२२ बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. दिवसभरात ३८ हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतर या बसेस कापतात. यातून दिवसभरात १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.
मोठ्या शहरांसाठी ४८ बसफेऱ्या दैनंदिन चालवण्यात येतात. यात पंढरपूर, नाशिक, मुंबई, पुणे, औरंगबाद आदी शहरांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या बसेसमधील प्रवासी संख्या ही निम्म्यावर आली आहे.
मुक्कामी जाणाऱ्या बसेस शुक्रवारपासूनच आगारात थांबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. बाहेरगावाहून मुक्कामी येणाऱ्या बसेसलाही थांबवले गेल्याची माहिती नंदुरबार आगारातून देण्यात आली आहे.
नंदुरबार आगारातून मुंबई, नाशिक, धुळे, पुणे, औरंगाबाद व पंढरपूर अशा १० बसेस या रातराणी असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या बसेसमध्ये प्रवासी नसल्याने त्या रिकाम्या चालवल्या जात असल्याचे दिसून आले आहे. काही शहरांमध्ये रात्री संचारबंदी असल्याने त्या ठिकाणी दिवसा जाण्यावर नागरिकांकडून भर दिला जात असल्याने बसेसची गर्दी कमी झाली आहे.
मुंबईकडे जाण्याची धास्ती
मुंबई परिसरात जिल्ह्यातील अनेक जण नोकरी-व्यवसायानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून स्थायिक झाले आहेत. हे नागरिक सण, उत्सव, लग्न यासह विविध कार्यक्रमांसाठी जिल्ह्यात येतात. या प्रवासाला त्यांची पहिली पसंती एसटीला असते. सोबतच येथून शिक्षण, नोकरी तसेच शासकीय कामांसाठी अनेक जण जातात. परंतु कोरोनामुळे नागरिक मुंबईकडे जाणे टाळत आहेत.
जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांची संख्या घटली
जिल्ह्यातून नाशिक किंवा मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत घट आली आहे. रात्रीच्या वेळी जाणाऱ्या बसेसमध्ये सहज जागा मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्रवास करणे टाळले जात असल्याने मोठ्या शहरांकडे जाणाऱ्या बसेसमध्ये प्रवासी संख्या तुरळक आहे. धुळे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जाणाऱ्या तसेच सुरतकडे जाणाऱ्या बसेसही रिकाम्या आहेत.
लाॅकडाऊनची तयारी पूर्ण झाली आहे. शुक्रवार रात्रीपासूनच बसेस बंद करण्यात येणार आहेत. त्यानुसार नियाेजन सुरू करण्यात आले आहे. शनिवार व रविवारी मुंबई व पुणे येथील बसेसचेही रिझर्व्हेशन देण्यात आलेले नाही.
- मनोज पवार, आगार प्रमुख, नंदुरबार