मुंबई महापालिकेत जिल्ह्यातील ६० परिचारिकांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 12:45 IST2020-04-14T12:45:06+5:302020-04-14T12:45:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : बृहनमुंबई महानगरपालिकेने परिचारिका भरतीसाठी निवड केलेल्या जिल्ह्यातील सुमारे ६० पात्र महिला उमेदवारांना कागदपत्रांसह गुरुवार, ...

मुंबई महापालिकेत जिल्ह्यातील ६० परिचारिकांची निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : बृहनमुंबई महानगरपालिकेने परिचारिका भरतीसाठी निवड केलेल्या जिल्ह्यातील सुमारे ६० पात्र महिला उमेदवारांना कागदपत्रांसह गुरुवार, १६ एप्रिल रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु राज्यातील लॉकडाऊनच्या परिस्थितीत तेथे कसे जायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाल्याने काही पालक व उमेदवारांनी आमदार राजेश पाडवी यांच्याकडे विनंती केली होती. आमदार पाडवी यांनी याप्रकरणी पोलीस प्रशासनाशी चर्चा करुन मार्ग काढल्याचे सांगण्यात आले.
बृहनमुंबई महानगरपालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील विविध रुग्णालयांमध्ये रिक्त परिचारिकांच्या जागांसाठी गेल्यावर्षी जाहिरात काढली होती. त्यासाठी मनपा परिचर्या शाळेकडून परीक्षा घेण्यात आली होती. त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे अर्ज केला होता. त्यानुसार नंदुुरबार जिल्ह्यातील उत्तीर्ण उमेदवारांनीही अर्ज केला होता. या प्रक्रियेस जवळपास दोन वर्षे झाली होती. तरीही भरतीबाबत महापालिकेने कुठलीच कार्यवाही केली नव्हती. ताथापि, सध्या कोरोना या महामारीने देशाला प्रचंड ग्रासले आहे. त्यात राज्यातून एकट्या मुंबईमध्येच मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे. साहजिकच कर्मचाऱ्यांचीही आवश्यक भासत असल्यामुळे परिचारिका भरतीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार परीक्षा उत्तीर्ण होऊन अर्ज केलेल्या महिला उमेदवारांना महापालिकेने आपल्या कागदपत्रांसह हजर राहण्याची सूचना केली आहे. त्यासाठी विविध प्रवर्गानुसार १३ ते १८ एप्रिलपावेतो हजर राहण्याची सूचना दिली आहे. नंदुरबारसह नवापूर, शहादा, तळोदा येथील सुमारे ६० महिला उमेदवारांना परिचारिका भरतीसाठी आवश्यक कागदपत्रांसह हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यातच पोलिसांकडून खाजगी वाहनांना बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे तेथे कसे जायचे असा प्रश्न पालकांपुढे निर्माण झाला आहे. आपल्या मुलींची नोकरीची चिंताही पालकांना भेडसावत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी काही पालकांनी आमदार राजेश पाडवी यांना प्रत्यक्ष भेटून व काहींनी भ्रमणध्वनीने संपर्क साधला. त्यानंतर आमदार पाडवी यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाशी याबाबत चर्चा केली. निवड झालेल्या महिला उमेदवारांना वाहन क्रमांक देऊन परवानगी देण्याचे त्यांनी मान्य केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आमदार पाडवी यांच्या प्रयत्नांमुळे नोकरीसाठी निवड झालेल्या महिलांचा मार्ग सुकर झाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.